शेजारी नदी तरी पिके तहानलेली

Nira-River
Nira-River

भवानीनगर - नदी अवघ्या काही फुटांवर; पण कोरडीठाक असल्याने इंदापूर तालुक्‍यातील जांब व आसपासच्या गावांच्या नशिबी दुष्काळ आहे. गावाच्या हद्दीतील सुमारे १५० एकर ऊस जळून जाण्याच्या मार्गावर आहे. जमिनी क्षारपड झाल्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेले शेतकरी आता हवालदिल झाले आहेत.

इंदापूर तालुक्‍यातील जांब हे गाव नीरा नदीकाठी वसलेले आहे. नदीकाठच्या गावांत समृद्धी फुलते, असे म्हणतात; पण जांब, उद्धट, तावशी, कुरवली, चिखली अशा गावांचा त्याला अपवाद आहे. नदीकाठी असल्याच्या फायद्याऐवजी मोठ्या प्रमाणात जमिनी क्षारपड होण्याचा शाप या गावांना आहे.

जांबमध्ये सध्या नीरा नदी कोरडी आहे. त्यामुळे गावातील सुमारे २५० एकर ऊसक्षेत्र धोक्‍यात आले आहे. त्यातही १५० एकर उभा ऊस जळून जाण्याच्या मार्गावर आहे. नदीकाठी असल्याने पूर्वी नीरा कालव्याचा बारमाही सिंचनाचा शेतकऱ्यांना मिळालेला परवाना पाटबंधारे खात्याने रद्द केला आहे. नदीवरून उचल पाण्याची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, मात्र तो आता उन्हाळ्यात टिकत नाही. यावर्षी तर दुष्काळामुळे जनावरे जगविणेही अवघड झाले आहे. त्यातल्या त्यात दिलाशाची बाब म्हणजे उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे येथे पिण्याच्या पाण्याची अजून तरी टंचाई नाही. मात्र, शेतीच्या अर्थकारणावर झालेला गंभीर परिणाम शेतकऱ्यांना अस्वस्थ करून टाकणारा आहे.

जांब, उद्धट, कुरवली या गावांमध्ये उसाच्या पिकांची अवस्था गंभीर आहे. आता सर्वच पिके जळून चालली आहेत. परिसरातील जळून चाललेल्या उसाचे सरकारने त्वरित पंचनामे करावेत. एकेका गावात शेतकऱ्यांचे दीड- दीड कोटीचे नुकसान होणार आहे. सरकारने त्वरित दखल घ्यावी; अन्यथा शेतकरी देशोधडीला लागतील.
- शिवाजी रूपनवर, निमंत्रक, क्षारपड जमीन सुधारणा शेतकरी कृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com