अकलूज - सराटी येथे नीरा नदीत वाळूमाफियांनी मोठे खड्डे निर्माण केले आहेत, तर अकलूजच्या बाजूकडील नदीपात्रातच डॉक्टरांनी वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) टाकून दिले आहे. त्यामुळे नागरिक व पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता बळावली आहे.
सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरून नीरा नदी वाहते. सराटी येथे पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम करून संत तुकारामांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. नीरा नदीत तुकोबांच्या पादुकांचा नीरा स्नानाचा सोहळा पार पडतो. या वर्षीचा हा सोहळा 18 जुलै रोजी होणार आहे. मागील तीन- चार वर्षांत पावसाने ओढ दिल्याने नीरा नदीत पाणी उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीत टॅंकरच्या पाण्याने तुकोबांच्या नीरा स्नानाचा सोहळा पार पाडला होता. यंदाचा नीरा स्नानाचा सोहळा नीरेच्या पाण्याने होण्यात अडचण येणार नाही; मात्र वाळूमाफियांनी नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे निर्माण केले आहेत, त्यामुळे नदीपात्रातील धोका वाढला आहे.
नदीपात्राच्या अकलूज दिशेला बंधाऱ्यापासून जवळच अनेक डॉक्टरांनी नदीपात्रातच मोठ्या प्रमाणावर "मेडिकल वेस्ट' टाकले आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेत या कचऱ्याचे ढीग पडले आहेत. इंजेक्शन्ससाठी वापरल्या जाणाऱ्या सीरिंज, सुया, कालबाह्य झालेली औषधे, द्रवरूप औषधांच्या काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा त्यात समावेश आहे.
|