शेतकऱ्यांची थकित देणी दिल्याशिवाय गाळप परवाना नाही 

शेतकऱ्यांची थकित देणी दिल्याशिवाय गाळप परवाना नाही 

दौंड  : पुणे जिल्ह्यातील बारामती अॅग्रो लिमिटेड, दौंड शुगर लिमिटेड व व्यंकटेश कृपा या तीन खासगी साखर कारखान्यांनी शेतकर्यांची सर्व प्रकारची देणी अदा केल्याशिवाय त्यांना सन 2018-19 च्या गळित हंगामासाठीचा गाळप परवाना दिला जाणार नाही, अशाप्रकारचा स्पष्ट आदेश साखर आयुक्तांनी दिल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. तिन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एकूण 57 कोटी 46 लाख रूपये थकविल्याने त्या रकमेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. 

दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाहेर शासनाच्या ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य भानुदास शिंदे व रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सर्फराज शेख यांच्या नेतृत्वाखाली 26 सप्टेंबर रोजी थकित रकमेच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. संघटनेचे नीलेश देवकर, गणेश साळुंखे, अभिमन्यू शिंदे, ज्ञानदेव आहेर, पांडुरंग फराटे, राधा शेलार, आदी आंदोलनात सहभागी झाले होते. महसूल विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) सन 2016-17 या हंगामात शेतकऱ्यांना देय रकमेपैकी बारामती अॅग्रो लिमिटेडने 20 कोटी 98 लाख 64 हजार रूपये, दौंड शुगर लिमिटेडने 18 कोटी 58 लाख 14 हजार रूपये व व्यंकटेश कृपा कारखान्याने 17 कोटी 89 लाख 42 हजार रूपये, असे एकूण 57 कोटी 46 लाख 20 हजार रूपये थकविले आहेत. उपोषणाच्या दरम्यान महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा पवार व शिरूर तालुकाध्यक्षा छाया सकट यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. 

दरम्यान राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी 28 सप्टेंबर रोजी पुणे येथे एका बैठकीत निर्देश दिल्यानंतर राज्याचे साखर आयुक्त यांनी तिन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांची सर्व प्रकारची देणी अदा केल्याशिवाय त्यांना सन 2018-19 च्या गळित हंगामासाठीचा गाळप परवाना दिला जाणार नाही, अशाप्रकारचा आदेश दिला. सदर आदेशाची प्रत दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर भाजप किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांच्या हस्ते जलपान करून आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

आरएसएफ सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन होणार

महसूल विभागणी सुत्राच्या (आरएसएफ) नियमातील 70:30 किंवा 75:25 या सुत्रांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी साखर संघ, वेस्टर्न इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, ऊस नियंत्रण मंडळातील शेतकरी व साखर कारखान्यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी, साखर संचालक यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय साखर आयुक्तालयाने घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com