पुणे : कोरोनामुळे महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यातच प्रथम सत्राची परीक्षा तोंडावर आली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गावागावांत ‘राष्ट्रीय सेवा योजने’चे शिबिर घेण्याचा घाट घातला आहे. महाविद्यालयांनी त्यासाठी पाच मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत व २० मार्चपूर्वी गावांमध्ये शिबिर घ्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी, त्यात सहभाग घेता यावा यासाठी ‘एनएसएस’चे महत्त्व आहे. दरवर्षी महाविद्यालयांतर्फे ‘एनएसएस’ शिबीराचे आयोजन केले जाते. सात दिवसांच्या शिबीरात विद्यार्थी गावातील स्वच्छता, पाणलोट क्षेत्राचे काम, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाबाबत जनजागृती असे विविध उपक्रम राबविले जातात. या शिबिरांमध्ये सहभागी होतात त्यांना गुण मिळत असल्याने त्यांना शैक्षणिक फायदा मिळतो. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित सुमारे ६०० महाविद्यालये दरवर्षी शिबिरांचे आयोजन करतात. त्यामध्ये साधारणपणे १५० विद्यार्थी सहभागी होतात. २०२० मध्ये महाविद्यालयांनी संयुक्तपणे १५० शिबिर घेतले होती. यावर्षी कोरोनामुळे महाविद्यालये बंद असली तरी शिबिर घेण्याबाबत महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे चौकशी केली जात होती. त्यानुसार विद्यापीठाने ‘एनएसएस’ शिबिरासाठी अर्ज मागविले आहेत.
सुरक्षेचे काय करणार ?
पुणे विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी शिबिरांचे आयोजन करताना स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, विद्यापीठ आणि राज्य व केंद्र सरकारच्या नियमावलीचे पालन करावे. शिबिरांच्या ठिकाणी शारीरिक अंतर ठेऊन कामे करून घ्यावीत व निवासाच्या व्यवस्थेसाठी गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची शहानिशा करावी अशा सूचना दिल्या आहेत. गावांमध्ये शिबिर होताना किमान १०० जण सात दिवस एकत्र राहणार आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याचा धोका पूर्ण शिबिरास तसेच गावातील
लोकांना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीती काही प्राध्यापकांनी व्यक्त केली.
सध्याच्या स्थितीत शिबिर घेणे योग्य नाही. गावात एकावेळी १०० विद्यार्थी राहणार, यातून धोका होऊ शकतो. घरचे देखील शिबिराला पाठविण्यासाठी तयार होणार नाहीत.
- तेजस्विनी घुले, विद्यार्थिनी
''विद्यार्थ्यांना गुण प्रदान करणे, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसाठी ‘एनएसएस’चे शिबिर घेणे अनिवार्य आहे. शिबिरासाठी महाविद्यालयांकडून चौकशी सुरू आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे महाविद्यालयास ५९० रुपये दिले जातात. ५ मार्चपर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली असून, त्यानंतर यंदा किती शिबिर होतील हे निश्चीत होईल. शिबिरांमध्ये कोरोनामुळे शासनाच्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.''
- डॉ. प्रभाकर देसाई,संचालक, एनएसएस, पुणे विद्यापीठ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.