जुने शब्द घासूनपुसून वापरा - अंबरिश मिश्र

एस. एम. जोशी सभागृह - शब्द फाउंडेशनने आयोजिलेल्या मुलाखतीदरम्यान एका क्षणी रंगलेले अंबरिश मिश्र आणि सुधीर गाडगीळ.
एस. एम. जोशी सभागृह - शब्द फाउंडेशनने आयोजिलेल्या मुलाखतीदरम्यान एका क्षणी रंगलेले अंबरिश मिश्र आणि सुधीर गाडगीळ.

पुणे - ‘‘आईनेच मला मराठी भाषेचे बाळकडू पाजले. आईमुळे मी मराठीत लिहायला आणि बोलायलाच शिकलो नाही तर, विचारही मराठीतच करतो. सध्याच्या मराठीतून अनेक शब्द जवळपास लुप्त होत चालले असून, भाषेच्या वाढीसाठी हे योग्य नाही. आपले जुने शब्द घासूनपुसून वापरले पाहिजेत. भाषा ही संवादाऐवजी केवळ संपर्कापुरतीच आवश्‍यक असल्याचे भासवत भाषेला केवळ अर्थार्जनापुरती आणून ठेवल्यामुळे आज भाषेची अवस्था वाईट आहे,’’ अशा शब्दांत पत्रकार व साहित्यिक अंबरिश मिश्र यांनी भाषेविषयीची आपली मतं मांडली.

‘शब्द फाउंडेशन’च्या वतीने आयोजित उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मिश्र यांना बोलते केले. या वेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रशांत कोठडिया, केतन गाडगीळ उपस्थित होते. आपल्या मुलाखतीदरम्यान मधूनच एखादा शेर ऐकवत आणि त्यावर रसिकांची मनमुराद वाहव्वा मिळवत मिश्र यांनी रसिकांना एक साठवून ठेवावा असा अनुभवही दिला. साहित्य, कला, चित्रपट, पत्रकारिता अशा अनेक विषयांवर त्यांनी संवाद साधला.

सध्याच्या चित्रपट संगीताविषयी खंत व्यक्त करत मिश्र म्हणाले, ‘‘चित्रपट संगीतामध्ये मेलोडी आवश्‍यक आहे. त्याशिवाय चित्रपट संगीत श्रवणीय होऊच शकत नाही. सध्याच्या चित्रपट संगीतात मेलोडी कुठेही दिसत नाही. त्यामुळे जुनेच संगीत कानांना अजूनही गोड वाटते.’’

आताचे राजकारण बदलले
मिश्र म्हणाले, ‘‘वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे अत्यंत नम्र मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री असूनही सामान्य माणसांमध्ये वावरण्याची कला त्यांच्याकडे होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती बदलली आहे. आता मुख्यमंत्री आणि इतरांमध्ये बरेच अंतर निर्माण झाले आहे. पूर्वी राजकारणाचा व्यवसाय झाला नव्हता; आता मात्र ते घडत चाललंय.’’

खरे गांधी ना काँग्रेसकडे, ना मोदींकडे !
मिश्र म्हणाले, ‘‘महात्मा गांधी म्हणजे संघर्षाचे जिवंत प्रतीक; मात्र स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूंसकट सर्वच राज्यकर्त्यांनी गांधींना केवळ पितृत्वाचे स्थान देत त्यांच्यातील ही संघर्षशक्ती जणू काढूनच घेतली. त्यांना सूतकताईपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे हे संघर्षमूर्ती गांधी खरंतर त्याचवेळी आपल्यातून निघून गेले. आज गांधी ना काँग्रेसकडे शिल्लक आहेत, ना मोदींकडे !’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com