
Kanda Anudan: अनुदानाची आशेने कांद्याची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण
पारगाव : राज्य शासनाने कांद्यासाठी साठी प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले असल्याने कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला परंतु शासन आदेशानुसार १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत बाजार समिती मध्ये विक्री झालेल्या कांद्यावर अनुदान मिळणार आहे.
त्यासाठी उद्या शुक्रवार (दि.३१) शेवटचा दिवस असल्याने मागिल तीन चार दिवसापासून शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर बाजार समिती मध्ये कांदा विक्रीस आणल्याने आवक मध्ये नेहमीपेक्षा चार ते पाच पटीने वाढ झाली त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावात प्रती किलो तीन ते चार रुपयांची घसरण झाली. (Latest Marathi News)
त्यातच अनुदानाच्या आशेने शेतकर्यांनी हिरव्या रसरशीत पातीवरील कांद्याची काढणी करून कच्चे कांदे मोठ्या प्रमाणावर विक्रीस आणले त्याचा परिणाम कांद्याचे वजनही घटले, बाजारभावही घसरले त्यामुळे शेतकर्यांना अनुदानाची आशा असूनही प्रत्यक्षात मात्र प्रचंड नुकसान होणार असल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
खरीपात अतिवृष्टीमुळे कांद्यासह सर्वच शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले त्यातच रब्बी हंगामात उत्पादित होणाऱ्या कांद्यास मागील चार ते पाच महिन्यापासून चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. (Marathi Tajya Batmya)
शेतकर्यांचा उत्पादन खर्चहि निघत नव्हता त्यामुळे राज्य शासनाने कांद्यासाठी प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले परंतु त्यासाठी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत विक्री झालेल्या कांद्यावर अनुदान मिळणार असल्याची मर्यादा घातली व एका शेतकर्यास जास्तीत जास्त २०० क्विंटल साठी अनुदान मिळणार आहे.
जीआर राज्य शासनाने २७ मार्च रोजी काढला त्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्षात चार दिवस शिल्लक राहिल्याने आंबेगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी हिरव्या रसरशीत पातीवरील कांद्याची काढणी करून कच्चे कांदे मोठ्या प्रमाणावर विक्रीस आणले त्याचा परिणाम कांद्याचे वजनहि कमी आणि गुणवत्ताही नाही,
त्यातच आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात मागील दहा दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने कांदे शेतात खराब होण्याच्या भीतीने शेतकर्यांनी तीन ते चार आठवडे कांदा काढणीस बाकी असतानाही शेतकर्यांनी कांदे काढुन बाजारात विक्रीस आणण्याची घाई केली.
त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याची आवक प्रचंड वाढली त्यातच कांद्याची गुणवत्ता हि चांगली नाही त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी कांद्याला प्रती क्विंटलला ७०० ते १२०० रुपये बाजारभाव मिळत होता तो आता ४०० ते ९०० रुपये मिळत आहे त्यामुळे जरी क्विंटलला ३५० रुपये अनुदान भेटले तरी तीन चार आठवडे अगोदर कच्चे कांदे काढल्याने वजन कमी भरले कच्चे कांदे असल्याने गुणवत्ताही चांगली नाही.
अनुदान भेटूनही बाजारभाव घसरल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशा पडली असल्याची माहिती वाळुंजनगर येथील कांदा उत्पादक व कांद्याचे व्यापारी महेंद्र वाळुंज तसेच गारपीटीचा सर्वात जास्त नुकसान झालेल्या पोंदेवाडी येथील कांदा उत्पादक व खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी दिली.
सचिन बोऱ्हाडे (सचिव- मंचर बाजार समिती)
दरवर्षी मार्च महिन्यात कांद्याच्या लिलावाच्या दिवशी २० ते २२ हजार पिशवीची आवक होत असे परंतु अनुदानाची मुदत उद्या ३१ मार्च रोजी संपत असल्याने आज एकाच दिवशी मंचर बाजार समिती आवारात सुमारे ९० हजार पिशवी आवक झाली आहे.