ऑनलाइन शिक्षणापासून दूरावलेल्यांसाठी ‘विकास मित्र’

ऑनलाइन शिक्षणापासून दूरावलेल्यांसाठी ‘विकास मित्र’

पुणे - राज्यात आता कुठे शाळा प्रत्यक्षात सुरू होत असल्या तरी मार्च २०२० पासून हजारो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहिले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान प्रबोधिनीचा ‘विकास मित्र’ प्रकल्प मदतीचा दूत ठरला आहे. 

ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना एकमेकांच्या मदतीने शिकण्याची संधी या प्रकल्पाद्वारे उपलब्ध झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. परंतु, ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचू शकत नसल्याने ज्ञान प्रबोधिनीच्या ‘विकास मित्र’ प्रकल्पातंर्गत या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वेल्हे तालुक्यातील सातवीपर्यंतच्या ३८ शाळा आणि आठवी ते दहावीच्या ११ शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. 

‘विकास मित्र’ हा प्रकल्प ज्ञान प्रबोधिनीने जुलै २०१९ मध्ये सुरू केला. यात विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक कौशल्य शिकवली जातात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या माध्यमातून गावागावांतील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या मदतीतून शिकण्याचा मार्ग मोकळा करून दिला. या अंतर्गत त्या-त्या गावातील नववी-दहावीचे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लहान वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार एका विद्यार्थ्यांना केवळ १० विद्यार्थ्यांची शाळा भरवायची आणि त्याचे पाढे, भाषा आणि वाचन असा अभ्यास घेण्याची जबाबदारी दिली. याप्रकारे जवळपास ४० शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. 

तसेच, प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययनावर लक्ष केंद्रित केले आहे. 

याबाबत प्रकल्प समन्वयक अमर परांजपे म्हणाले, ‘‘दरवर्षी दहावी-बारावीचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष मिळते. परंतु यंदा ग्रामीण भागातील विशेषतः ऑनलाइन शिक्षण पोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांसमोर अभ्यास करायचा कसा, हा प्रश्न आहे. आता नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी संपूर्ण वर्षभराचा अभ्यास काही महिन्यात पूर्ण भरून काढणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थी हेच स्वतः अभ्यास करून परीक्षेसाठी तयारी करू शकणार आहे. हे लक्षात घेऊन ‘स्वयं अध्ययन कसे करावे’ याबाबत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असून त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतला जात आहे.’’

स्वयंअध्ययन असे करावे
    अभ्यास कशासाठी करायचा, हे उद्दिष्ट निश्चित करावे
    अभ्यासक्रमातील धडा वाचा, त्यातील काय-काय कळाले ते पहा
    अभ्यासक्रमातील जो भाग कळलेला नाही, त्याबाबत इतरांकडून समजून घ्या
    परीक्षेचा सराव करण्यासाठी नियोजन हवे
    विविध प्रश्न प्रकाराची तयारी, उजळणी करावी
    सराव प्रश्नपत्रिका वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने सोडवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com