आपत्तीच्या काळातही नवनिर्मितीची संधी - अभिजित पवार

Abhijit-Pawar
Abhijit-Pawar

पुणे - ‘पदवीधर झालात म्हणजे रोजगारक्षम होऊ शकत नाही, त्यासोबतच किमान पूरक अभ्यासक्रम केले, तरच बदलत्या स्थितीत टिकून राहता येईल. आपत्तीच्या काळातच नवनिर्मितीची संधी असते. तुमच्याकडे क्षमता, गुणवत्ता आहेच, त्याला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास नव उद्योग उभारणीत यशस्वी व्हाल,’’ असा सल्ला ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि महा असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सतर्फे (महाटीपीओ) आयोजित ‘नो गोईंग बॅक, पोस्ट कोविड १९’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये पवार बोलत होते. यावेळी संयोजक संजय धायगुडे, शीतलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते. कोविड १९, शिक्षणपद्धती, उद्योग, रोजगार, पर्यावरण, विद्यार्थ्यांमधील सामाजिक भान या मुद्द्यावर उदाहरणांसह पवार यांनी भविष्याचा वेध घेत भाष्य केले.

पवार म्हणाले, ‘‘देशात दरवर्षी ३ कोटी ७० लाख तरुण पदवीधर होतात, त्यापैकी ८० टक्के रोजगारक्षम नसतात, हे चिंताजनक वास्तव असेल, तर शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलांना सुरवात केली पाहिजे. शिक्षक, प्राध्यापक हाच विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतो. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर वैविध्यपूर्ण शिक्षण घेतले पाहिजे.’’

जर्मनीकडून धडा घ्या
‘रोजगारक्षम शिक्षणाबरोबर बेरोजगारीचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी जर्मनीतील मॉडेलचा विचार केला पाहिजे. जर्मनीमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षीपासून उद्योगांमध्ये थेट काम करायची संधी मिळते, त्यामुळे विद्यार्थी रोजगारक्षम बनतात, नवीन कल्पना विकसित करतात. प्लेसमेंटसाठी चौथ्या वर्षाची वाट न बघता पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये काम करायची संधी देत शिकविले पाहिजे. तसेच भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पदवीसह किमान दहा ते बारा प्रमाणपत्र कोर्स करून ज्ञान वाढविणे ही काळाची गरज आहे,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘मानवी चुकांमुळे ‘कोविड १९’चा विषाणू निर्माण झाला. या छोट्याशा विषाणूसमोर महासत्ता, अणुशक्ती, शस्त्र, पैसा सर्व काही हतबल ठरले. यातून बाहेर पडण्यासाठी संशोधन सुरू आहे, ते संशोधन आपण का करू शकता नाही? यातून आपण उपाय का शोधू शकत नाही, याचा विचार करून महाविद्यालयांनी काम सुरू केले पाहिजे. ही आपत्ती मोठी संधी आहे, नवीन संशोधन करायचे म्हणजे फक्त रोबोट, कार तयार करायचे असे नाही. समाजातील समस्या शोधून त्यावर उपाय शोधा. त्यातून स्वयंरोजगाराची नवी वाट तुम्हाला सापडेल,’’ असे पवार यांनी सांगितले.

विश्वाची चिंता करा, आपलेही प्रश्न सुटतील
प्रत्येक गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकले पाहिजे. आपण आपलाच विचार  करण्यापेक्षा विश्वाची चिंता केली आणि  त्यावर मार्ग शोधला, तर त्यासोबत आपलेही प्रश्न सुटतील. पृथ्वीवर कोणीही सुपरपाॅवर नाही, प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आले पाहिजे, तरच या संकटातून सुटका होईल. चीन आणि अमेरिकेमध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू आहे. पण सुपर पाॅवर कोण, याचा विचार करणे हे धोकादायक आहे, असेही पवार यांनी सांगितले.

समाजाचे देणे विसरू नका
शिक्षण झाल्यावर विद्यार्थी परदेशात जातात, मल्टिनॅशनल  कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी करतात, पैसा मिळवतात. पण तुम्ही समाजाचे देणे लागता हे विसरू नका. समाजातील समस्या, दु:ख सोडविण्यासाठी तुम्ही शासन, सामाजिक संस्था, संशोधन संस्थांच्या माध्यमातून काम करून जबाबदार नागरिकाची भूमिकाही पार पाडली पाहिजे, असा मौलिक सल्ला पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अभिजित पवार यांच्या सूचना

  • ‘कोविड १९’मुळे उद्योगांवर परिणाम झाला, पण नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत
  • कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नका, तिचे मोल दिले पाहिजे
  • नवीन उद्योग, स्टार्टअपमध्ये पहिल्या प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. तिथे अपयश आले, पचवायला शिका, खचून जाऊ नका. कारण तेच शिक्षण आहे
  • ऑनलाईन शिक्षणाद्वारे ज्ञान वाढवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com