हर्षवर्धन पाटलांकडे काँग्रेस प्रदेशाध्यपद द्या; कार्यकर्त्यांची मागणी

harshwardhan patil
harshwardhan patil

इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रातील काँग्रेसची पडझड रोखून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच काँग्रेसचे जेष्ठ व युवा नेते यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून होत आहे.  

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली असून मागील निवडणूकी पेक्षा काँग्रेस मतात घट झाली आहे. काँग्रेस तसेच प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा या निवडणूकीत पराभव झाल्यामुळे चव्हाण यांनी राजीनामा देवू केला आहे.आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसची पडझड रोखण्यासाठी अभ्यासू, संयमी तसेच वेळ पडेल तसे आक्रमक नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभुमीवर हर्षवर्धन पाटील यांची निवड सर्वसमावेशक ठरू शकते. 

सन १९५२ सालापासून किरकोळ अपवाद वगळता इंदापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांनी तालुक्याच्या विकासाची पायाभरणी केली असून त्यावर कळस चढवायचे काम माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. शंकरराव पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची राजकीय वारस म्हणून निवड केल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर भाजपा शिवसेनेच्या युती 
सरकार मध्ये ते मंत्री झाले. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी मंत्रीमंडळात मिळालेल्या पदांचा सन्मान वाढविला. मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण तसेच पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांबरोबर काम करताना त्यांचे नेतृत्व प्रगल्भ झाले. मात्र मागील विधानसभा निवडणूकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. मात्र त्यांच्या मतामध्ये मागील मतापेक्षा किमान ५ हजार मतांची वाढ झाली.

बहुतांशी विरोधकांची मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांना मिळाल्याने पाटील यांचा पराभव झाला. मात्र लोकसभा निवडणूकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत प्रचार करताना इंदापूर विधानसभा निवडणूकीचे तिकिट हर्षवर्धन पाटील यांना देण्यासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी तसेच शरद पवार हे निर्णय घेणार असल्याची भुमिका त्यांनी मांडली.

बारामती नंतर इंदापूर तालुक्याने सुळे यांना सर्वाधिक मताधिक्य दिले. त्यामुळे मोदी लाटेत सुध्दा बारामती पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिले. मात्र मागिल विधानसभा निवडणूकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी दिली नाही. याउलट जिथे कमी तेथे हर्षवर्धन पाटील हे समीकरण राहिले. मंत्रीमंडळात असताना सर्वांना बरोबर घेवून सभागृह चालविण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश होईल म्हणून अनेकदा वावड्या उठल्या. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसशी इमान राखले. त्यामुळे काँग्रेसला नवचैतन्य प्राप्त करून देण्यासाठी पाटील यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पक्षश्रेष्ठींनी निवड करावी अशी मागणी होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com