पवना धरणाची क्षमता वाढणार 

पवना धरण
पवना धरण

पिंपरी : शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे तसेच वाढीव कोटा मिळावा, यासाठी पवना धरणाचे मजबुतीकरण करून एक मीटरने पाणी साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामुळे एक अब्ज घनफूट (टीएमसी) जादा पाणी उपलब्ध होणार असून, शहराची तहान भागणार आहे. 

शहराच्या निवासी भागासह औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणी जलविद्युत केंद्राद्वारे नदीपात्रात सोडले जाते. नदीवर रावेत येथे बंधारा बांधण्यात आला आहे. येथून महापालिका 480 दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा करते. एमआयडीसी, पुणे महापालिकेचा वाघोली प्रकल्प व हिंजवडी पाणीपुवरठा प्रकल्पाचेही जलउपसा केंद्र बंधाऱ्याजवळ आहेत. एमआयडीसीकडून महापालिका 30 एमएलडी पाणी दररोज घेते. शहराची वाढती लोकसंख्या व वाढती मागणी लक्षात घेता सध्याचे पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पाणी प्रश्‍न गंभीर झाला. भविष्याचा विचार करता धरणाची साठवण क्षमता वाढवावी लागणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

रावेत बंधाऱ्यातील गाळ काढला 
पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी गाळ काढला. त्यामुळे पाण्याचा साठा वाढला आहे. यासाठी दापोडीतील पाटबंधारे विभागाची मदत घेण्यात आली. यासाठी दहा लाख रुपये खर्च आला आहे. तो नवीन बंधारा बांधण्यासाठीच्या तरतुदीमधून देण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. 

पाणीसाठा 1.2 टीएमसी वाढणार 
पवना धरण बांधून झाल्यानंतर काही वर्षांनी गळती लागली. क्वालिटी कंट्रोल व सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च संस्था (केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था) यांनी तांत्रिक परीक्षण केले. त्यानंतर धरणाच्या मजबुतीकरणाचा निर्णय घेतला. परंतु, मोबदला मिळाल्याशिवाय मजबुतीकरण होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने काम रखडले. आता शेतकऱ्यांना जमीन मोबदला देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. सध्या धरणाची साठवण क्षमता दोन हजार 12 फुटांपर्यंत आहे. मजबुतीकरणानंतर दोन हजार 16 फूट साठवण क्षमता होणार आहे. परिणामी, 1.2 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा वाढणार आहे, असे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी सांगितले.

""पवना धरणाची एक मीटरने साठवण क्षमता वाढविल्यास एक टीएमसी साठा वाढेल. यामुळे पाण्याचा फुगवटा वाढला तरी शेतकऱ्यांची एक इंचही जमीन जाणार नसल्याने काहीही नुकसान होणार नाही. तसेच, धरणाची गळती रोखण्यासाठी मजबुतीकरण करावे लागणार आहे. धरणाची साठवण क्षमता वाढविण्याचा खर्च राज्य सरकारकडे जमा केला आहे.'' 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 

सद्यःस्थिती 
- रावेत बंधाऱ्यातून उपसा : 480 एमएलडी 
- एमआयडीसीकडून पाणी : 30 दशलक्ष लिटर 

मंजूर पाणी 
- आंद्रा धरण : 100 टीएमसी 
- भामा-आसखेड धरण ः 167 टीएमसी 

दृष्टिक्षेपात पवना धरण 
- उद्देश : वीज व पाणी 
- प्रकार : माती व कॉंक्रिट 

बांधकाम 
- सुरू : 1966 
- पूर्ण : 1972 

क्षेत्र 
- बुडित : 2365 हेक्‍टर 
- लाभ : 5946 हेक्‍टर 

क्षमता 
- प्रकल्पीय : 10.76 टीएमसी 
- उपयुक्त : 9.67 टीएमसी 

वस्तुस्थिती 
- उंची : 42 मीटर 
- पाणलोट : 113 चौ.किमी 

गावे 
- बुडित : 17 
- लाभार्थी : 33 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com