उन्हाळ्यात तहान भागणार; 15 जूनपर्यंत पुरणार पाणी 

उन्हाळ्यात तहान भागणार; 15 जूनपर्यंत पुरणार पाणी 

पिंपरी  - परतीच्या पावसामुळे 31 ऑक्‍टोबर अर्थात गुरुवारी पवना धरण शंभर टक्के भरले आहे. हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात शहरवासीयांची तहान पूर्ण क्षमतेने भागणार असल्याची स्थिती आहे. 

पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणातून दररोज नदीत विसर्ग सोडला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उचलून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. शुद्ध केलेल्या पाण्याचे शहरातील टाक्‍यांद्वारे वितरण केले जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. सध्या गळती व चोरीमुळे काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू आहे. महापालिका प्रशासन व जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार 31 ऑक्‍टोबर रोजी धरण शंभर टक्के भरलेले असल्यास 15 जूनपर्यंत पाणीसाठा पुरतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. सध्या परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. 

मंजूर कोटा 480 एमएलडी 
जलसंपदा विभागाकडून शहरासाठी दररोज 480 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा कोटा मंजूर आहे. शिवाय, एमआयडीसीकडून महापालिका 30 एमएलडी पाणी दररोज घेते. असे 510 एमएलडी पाणी शहरासाठी मिळते. मात्र, जुन्या जलवाहिन्या, व्हॉल्व्हमधून होणारी गळती व चोरीचे प्रमाण 35 टक्‍क्‍यांवर असल्याने काही भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होतो. शहरवासीयांना पुरेसे पाणी देण्यासाठी व उन्हाळ्यातील पाणीप्रश्‍नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाणी गळती व चोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. 

कार्यवाही सुरू 
पाणी गळती व चोरी रोखण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकण्याचे काम सुरू आहे. पाणी मीटर बदलून दिले जात आहेत. अनधिकृत नळजोड अधिकृत करून दिले जात आहेत. तरीही चोरीचे प्रकार घडल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शिवाय, शहराच्या 40 टक्के भागात केंद्र सरकारच्या 24 बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यामुळे खोदकाम करता येत नसल्याने चार महिन्यांपासून काम बंद होते. आता ते पुन्हा सुरू केले जाणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले. 

""पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून दररोज 480 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जात आहे. 31 ऑक्‍टोबर रोजी शंभर टक्के पवना धरण भरलेले असल्यास पंधरा जूनपर्यंत पाणीसाठा पुरतो. त्यामुळे पुरेसे पाणी मिळेल. मात्र, त्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे.'' 
- मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com