Loksabha 2019 :  भाजपला मानणाऱ्या भागात टक्का वाढला 

Loksabha 2019 :  भाजपला मानणाऱ्या भागात टक्का वाढला 

पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या मतदानाचा टक्का घसरला असला, तरी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी हमखास उभ्या राहणाऱ्या कोथरूड, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील मतांचा टक्का कॉंग्रेसला मानणाऱ्या विधानसभा मतदारसंघांपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या तीन मतदारसंघांत कॉंग्रेस किती मते घेणार, यावर निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. 

पुणे मतदारसंघातील मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 4.4 टक्‍क्‍यांनी घसरला. यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा 2.41 लाखांनी वाढली होती. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला, तरी गेल्या निवडणुकीच्या आसपासच मतदान करणाऱ्यांचा आकडा राहिला आहे. कोथरूड मतदारसंघात 50.26 टक्के मतदान झाले. मात्र, या मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 73 हजार मतदार वाढले होते. त्यामुळे मतदानाची टक्‍केवारी घटलेली दिसत असली, तरी याठिकाणी 2 लाख 527 मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या 18 हजार 335 ने वाढली आहे. मागची लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक पाहिली, तरी या ठिकाणी भाजपचे मताधिक्‍य मोठे आहे. या मतदारसंघात कॉंग्रेस आघाडी भाजपचे मताधिक्‍य किती कमी करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

कसबा मतदारसंघ भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचे "होम पीच' असतानाही या ठिकाणचे मतदान वाढविण्यात मात्र त्यांना यश आले नाही. 2014 मध्ये या मतदारसंघात 1.63 लाख मतदान झाले होते. यंदा तो आकडा 1.61 हजारांपर्यंत कमी झाला आहे. भाजपला या मतदारसंघात 2014 ला 58 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. ते राखण्यात भाजपला यश येणार काय, हे महत्त्वाचे आहे. या मतदारसंघातील मुस्लिम मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहिले, हाही उत्सुकतेचा विषय आहे. 

पर्वती मतदारसंघात प्रत्येकी वेळी भाजपला मानणाऱ्या मतांचा टक्का वाढत आहे. या मतदारसंघात या वेळी 31 हजारांनी मतदारांची संख्या वाढली होती. गेल्या लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत (1.76 लाख) यंदा सात हजाराने (1.83 लाख) मतदान वाढले आहे. भाजपला गेल्या निवडणुकीत 69 हजार मतांचे मताधिक्‍य मिळाले होते. 

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात यंदा 64 हजार मतदान वाढले होते. पण, मतदानाचा टक्का मात्र वाढला नाही. मतदारसंख्या जास्त असल्याने इतर विधानसभा मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक म्हणजे 2 लाख सहा हजार मतदान याठिकाणी झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा या वेळी साडेसोळा हजारांनी मतदान वाढले आहे. याठिकाणी भाजपला गेल्या निवडणुकीत 42 हजारांचे मताधिक्‍य होते. कॉंग्रेसला या वेळी या मतदारसंघात जास्त आशा आहेत. कसबा, पर्वती, आणि कोथरूड मतदारसंघात झालेल्या मतदानाची बेरीज पाच लाख 45 हजार येते; तर वडगावशेरी, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंटमधील मतांची बेरीज 4 लाख 88 हजार येते. 

भाजपचे मताधिक्‍य कॉंग्रेस रोखणार? 
कॉंग्रेसला 2009 मध्ये वडगावशेरीतून 21 हजार, शिवाजीनगरमधून 11 हजार, तर कॅन्टोन्मेंटमधून 27 हजारांचे मताधिक्‍य होते. 2014 मध्ये मात्र या तीनही मतदारसंघांत भाजपने मताधिक्‍य मिळविले होते. विधानसभा निवडणुकीतही भाजपने याठिकाणी बाजी मारली होती. या वेळी कॉंग्रेसला सर्वाधिक आशा असणाऱ्या कॅन्टोमेंट मतदारसंघात 1.40 लाख मतदान झाले आहे. तर, शिवाजीनगर मतदारसंघातही गेल्या वर्षीपेक्षा मतदानात किरकोळ घटच झाली आहे. याठिकाणी 1.42 लाख मतदान झाले असले, तरी याठिकाणी गेल्या पाच वर्षांत भाजपची ताकद वाढली आहे. 

वंचित आघाडीचा प्रभाव पडणार का? 
रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) भाजपच्या सोबत होता. त्याला धक्का देण्यात कॉंग्रेसला कितपत यश यावरही निकालाचा कल अवलंबून राहील. बहुजन वंचित आघाडीचा शहरात किती प्रभाव पडतो, याबाबतही उत्सुकता राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com