सावळ्या गोंधळातच आयुक्तालयाची वर्षपूर्ती

Police-Commissioner-Office
Police-Commissioner-Office

पिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाच्या अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींना पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची जुळवाजुळव, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, विभागांच्या जागांचे नियोजन अशा सावळ्या गोंधळात वर्ष निघून गेले.

कार्यालयीन विस्कळितपणामुळे अद्याप विविध स्वतंत्र पथके कार्यान्वित होऊ शकली नाहीत. स्वतंत्र आयुक्तालयाच्या दृष्टीने अनेक गोष्टींची कमतरता असल्याचे दिसून येते.

केवळ स्थापना, सुविधांचे काम
राजकीय नेत्यांच्या श्रेयवादातून आयुक्तालय स्थापनेचा तातडीने घाट घातला गेला. मात्र, स्थापनेपूर्वी आयुक्तालयासाठी प्रशस्त जागा, अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक, सरकारी निधी, इतर सोईसुविधा याबाबतचे नियोजन अगोदरच होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. आयुक्तालयासाठी सरकारने केलेल्या तरतुदी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे केवळ आयुक्तालय स्थापन झाले. मात्र, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सोईसुविधांसाठी झगडावे लागत आहे. 

८९ जण तडीपार
वर्षभरात आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध दहा ठाण्यांमधून ८९ जणांवर तडीपारची कारवाई करण्यात आली. यामध्ये पिंपरी १९, चिंचवड ११, भोसरी १, एमआयडीसी भोसरी १२, चाकण ७, निगडी ८, वाकड १७, सांगवी ६, हिंजवडी १, दिघी ७ यांचा समावेश आहे.

गुन्हा दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ
आयुक्तालय झाल्यापासून एखादी छोटी घटना असली तरी त्याची तातडीने दखल घेतली जात असून, गुन्हाही दाखल होत आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात बारा हजार ७२ गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. यासह तपासाला वेग दिला जात असून, सायबर सेल, इंडस्ट्रिअल सेल, क्राईम युनिट, स्वतंत्र वाहतूक विभाग, महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.

पगाराची बोंब
पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस दल मिळून आयुक्तालय स्थापन झाले. यासह इतर जिल्ह्यातीलही कर्मचाऱ्यांचा समावेश झाला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पगाराला अनेकदा विलंब होतो. ‘डिटॅच-ॲटॅच’ प्रक्रियेमुळे वेळेत पगार होत नाहीत. शाळा प्रवेश, लग्नसराई असलेल्या मे, जून महिन्यात पगाराला उशीर झाला. यामुळे काही कर्मचाऱ्यांवर उसने पैसे घेण्याची वेळ आली. सध्याच्या ऑगस्ट महिन्याचा अद्यापही पगार झालेला नाही.

वाहनांचा अभाव
कॉल आला की तातडीने घटनास्थळी पोचावे लागते. मात्र, वेळेत न पोचल्यास जादा कवायतीची शिक्षा दिली जाते. मात्र, या ‘रिस्पॉन्स टीम’ला वाहनांसारख्या सुविधाच नसल्याने वेळेत पोचणे शक्‍य होत नाही. सध्या प्रत्येक पोलिस ठाण्यात एक अथवा दोनच सरकारी चारचाकी वाहने आहेत. या दोन वाहनांपैकी एक वाहन वरिष्ठ निरीक्षकासाठी तर दुसरे वाहन आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी अथवा इतर कामकाजासाठी असते.

दरम्यान, ‘रिस्पॉन्स टीम’ला एखादा कॉल आल्यास त्यांना वेळेत पोचणे शक्‍य होत नाही. अशातच वाहन उपलब्धतेअभावी घटनास्थळी पोचण्यास उशीर झाल्यास त्याचा ठपका पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच ठेवला जातो. त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागते. दरम्यान, प्रत्येक ठाण्यांना किमान तीन वाहनांची तरी आवश्‍यकता आहे.

तपासाला वेग 
तक्रारदाराची पोलिस ठाण्यात दखल न घेतल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी ते सहज उपलब्ध होत नव्हते. मात्र, आयुक्तालय स्थापन झाल्यापासून तक्रारदार थेट चिंचवड येथील आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात आहे. अनेकांचे ठाण्यांमध्ये न सुटणारे प्रश्‍न आयुक्तालयात आल्यावर मार्गी लागले आहेत.

बदल्यांचे सत्र
आयुक्तालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. वर्षभरात एकाच अधिकाऱ्याची पाच ते सहा वेळा बदली झाली आहे. यामुळे कामकाजातही विस्कळितपणा येत असल्याचे दिसून येते. यासह आयुक्तालयासाठी श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञ, शस्त्रागार, क्विक रिस्पॉन्स टीम या पथकांची आवश्‍यकता आहे. मात्र, पथकासही अद्याप मुहूर्त लागलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com