आळंदीत वारी काळातच इंद्रायणी प्रदूषित

आळंदीत वारी काळातच इंद्रायणी प्रदूषित

आळंदी (पुणे) : कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून वारकरी आले आहेत. मात्र, त्यांना इंद्रायणीच्या तीर्थस्नानासाठी प्रदूषित पाण्यातच डुबकी मारावी लागत आहे. प्रशासनाने दाखविलेली अनास्था आणि पिंपरी महापालिका हद्दीतून सोडण्यात येणारे सांडपाण्यामुळे ऐन कार्तिकीतही प्रदूषित पाण्याला सामोरे जावे लागत आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला. इंद्रायणीला पाणीही भरपूर आहे. मात्र, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी स्नान करतात त्या गरुडस्तंभ ते पुंडलिक मंदिर परिसरात आधीच पाण्याची पातळी कमी आहे. त्यातच प्रदूषित पाणी असल्याने वारकऱ्यांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. चार दिवसांपासून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आणखी दोन दिवसांत अडीच लाखांपेक्षा अधिक वारकरी जमा होण्याची शक्‍यता आहे. मात्र, आळंदीत इंद्रायणी काठी अंघोळीला गेल्यावर भाविकांना नाइलाजाने खराब पाण्यात अंघोळ करावी लागत आहे.

वास्तविक पिंपरी महापालिका हद्दीत सोडण्यात येणाऱ्या सततच्या सांडपाण्यामुळे इंद्रायणी ऐन वारीतही प्रदूषित आहे. याचबरोबर आळंदी पालिका हद्दीतूनही अनेकांनी सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले आहे. याचबरोबर इंद्रायणीच्या सभोवतालचा परिसरही अत्यंत घाणेरडा आहे. स्वामींचा घाट ते ज्ञानेश्वरी मंदिर, पुंडलिक मंदिर ते जुना पूल आणि भागेश्वरी मंदिराच्या मागील बाजूस अस्वच्छता, सांडपाणी आणि मोठ्या प्रमाणावर खडी पडल्याने हा परिसर अत्यंत घाणेरडा आहे. खरे तर पालिकेने या ठिकाणी दगडी घाट अथवा रस्ता करणे अपेक्षित होते. मात्र, पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाला काहीच देणेघेणे नसल्याने हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे.

खरेतर वारकरी येणार म्हटल्यावर मावळ भागातील वडिवळे अथवा आंद्रा धरणातून पाणी सोडणे अपेक्षित होते. नुकतेच वारी नियोजनाच्या बैठकाही पार पडल्या. मात्र, अद्याप पाणी सोडण्याबाबत प्रशासकीय पातळीवर काहीच प्रयत्न न झाल्याने वारकऱ्यांना स्नानासाठी प्रदूषित पाण्याशिवाय पर्याय नाही. एकंदर भोंगळ कारभाराचे दर्शन यंदाच्या वारीत पाहायला मिळाले.

इंद्रायणी परिसर स्वच्छ करण्याची गरज

ज्ञानेश्वरी मंदिर ते स्वामी घाटापर्यंत दगडी घाट बनविण्याची आवश्‍यकता. भागेश्वरी आणि पुंडलिक मंदिर ते जुना पूल राडारोडा उचलून सफाईची गरज. बंधाऱ्यापासून जुन्या पुलापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूने प्रखर प्रकाशझोतच्या विद्युत दिव्यांची आवश्‍यकता आहे

पाटबंधारे विभागाला यापूर्वीच पाण्याची पातळी पाहून पाणी सोडण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र, त्यांना पाणी सोडण्याबाबत सांगितले जाईल. आंद्रा किंवा वडिवळे धरणातून पाणी सोडले जाईल.
- समीर भूमकर, मुख्याधिकारी, आळंदी पालिका

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com