Pune News: पुण्यात उड्डाणपुलावर सुरु असलेलं तरुणाचं जीवघेणं आंदोलन अखेर मागे; म्हणाला, किती तरी वेळा...
पुण्यातील संचेती रुग्णालयाच्या चौकातील उड्डाणपुलाच्या खांबवर जाऊन जीवघेणं आंदोलन करणाऱ्या तरुणानं अखेर आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. अग्निशमनच्या जवानांनी त्याची सुटका केल्यानंतर या पीडित तरुणानं माध्यमांशी संवाद साधला आणि आपण आंदोलन का केलं? हे स्पष्ट केलं. (Protest of a youth on flyover in Pune is finally over He told media reason behind agitation)
महेंद्र डवखर असं या पीडित मुलाचं नाव असून तो जुन्नरचा रहिवासी असून त्याचे वडील शेतकरी आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तो म्हणाला, तहसीलदार जुन्नर हे कायम कामात दिरंगाई करत होते. किंवा अन्य अधिकारी असू द्या तुमच्या आमच्या कामात शासकीय अधिकारी कायम दिरंगाई करतात. तहसीलदार जुन्नर यांनी अन्याय केला म्हणून मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला हौस नव्हती हे करायचं, तुम्हाला त्रास द्यायची. (Pune News)
"पण कुठे ना कुठे हे प्रश्न तुमचे देखील होते ना? सरकारचं उत्तर आपल्याला लवकर येतं का? किती चकरा घालाव्या लागतात आपल्याला याला कोण जबाबदार? मी सर्व जनतेची माफी मागतो हे ट्राफिक जाम झालं त्यासाठी. मी क्षमस्व आहे, मला माफ करा. पण कुठेतरी हे तुमचे देखील प्रश्न आहेत. सरकारनं जर माझ्या अडचणीत लक्ष घातलं असतं तर ही वेळच आली नसती. एखादी फाईल समोर आल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना एक ठराविक वेळ ठरवून देण्यात यावी. जर यामध्ये एखादा अधिकारी चुकला तर त्याच्यावर कधी कारवाई होणार? त्याचाही वेग वाढवायला हवा" (Latest Marathi News)
मी इथं आलो कारण तहसीलदारांनी माझं काम करायला घेतलं. तहसीलदारांनी मला यात पाडलं. कितीतरी वेळा त्यानं मला फसवलं. त्यांचं माझ्या वडिलांना पत्र आहे की, आमुक तमुक तारखेला तुमचा अहवाल प्रांताकडं पाठवला आहे. तो त्यांना दिला गेला नाही दुसऱ्या तारखेलाही दिला नाही, अशा शब्दांत महेंद्र डवखरनं आपली खदखद व्यक्त केली.
तहसीलदार म्हणतात....
जुन्नरच्या तहसीलदारांनी यावर आपली बाजू मांडली. त्यांनी म्हटलं की, संपत डावखर हे या मुलाचे वडील सुलतानपूर गावचे आहेत. या गावात त्यांच्या भावकीतील काही मिळकत आहे. याच्या सातबाऱ्यात १९५२ पासून आजपर्यंतच्या उताऱ्यात त्रृटी झालेल्या आहेत. एकत्रीकरण करताना यात काही चुका झालेल्या आहेत. या चुका दुरुस्त कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. यापूर्वी त्यांनी पूर्वीच्या तहसीलदारांकडं अर्ज केले होते. सर्व तहसीलदारांनी त्यांच्या अखतारीतील काम पूर्ण केले पण पुढील कार्यवाहीचे त्यांचे अपील वरिष्ठांनी फेटाळली होती. आम्ही त्यांना अपील करायला सांगितलं पण आम्हीच ते करावं यासाठी ते अडून राहिले. पण हे काम माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाही, त्यांना ही कल्पना दिली होती. यापूर्वी ते २३ तारखेला उपोषणाला बसले होते. त्यांचा अहवाल पुढे पाठवल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं होतं. पण आज अचानकच कुठलीही नोटीस न देता त्यांनी उपोषण सुरु केलं आणि त्यांच्या मुलानं पुण्यात केलं. पण आता त्याच्या वडिलांशी मी बोललो त्यामुळं त्यांनी उपोषण मागे घेतलं पण मुलगा अद्याप उपोषणावर ठाम होता.