पुलवामाबाबतच्या विधानाचा विपर्यास - शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

बारामती - ‘‘पुलवामातील घटनेनंतर दहशतवाद्यांवर हल्ल्याचा मी सल्ला दिल्याच्या बातम्या या विपर्यास असून, या विषयाचे राजकारण करण्याची इच्छा नाही,’’ असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला आहे.

पवार यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे, ‘‘पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलांच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकिस्तानातील बालाकोट आणि इतर ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे हवाई बॉम्बहल्ल्याने नष्ट करावेत, असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला. परंतु, तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. सदर बैठकीत मी सल्ला दिला नसून, केंद्र सरकारच्या यासंदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांनी पाठिंबा दिला होता. ’’

कारवाईचे राजकारण नको
‘‘भारतीय सैन्याचा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचीती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाईदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले, याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com