
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दहा वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली.
Accident : भरधाव ट्रकने दहा वाहनांना उडवले
पुणे - मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दहा वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. मात्र, या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
दिलीप हरिष सिंह (वय २७, रा. राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने ट्रक निघाला होता. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ वडगाव पुलाच्या परिसरात उतारावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले.

या भरधाव ट्रकने दहा चारचाकी वाहनांना धडक दिली. त्यात पोलिसांच्या गाडीसह टेम्पो आणि आठ कारचे नुकसान झाले. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.