पिकांच्या नुकसानीचे तत्‍काळ पंचनामे करा : जिल्हाधिकारी

crop_damage
crop_damage

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला आहे. मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्‍तपणे पंचनामे करावेत, असेही जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले.

जिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली आहे. महापालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत देखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तात्काळ कार्यवाही करुन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश राम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.

राज्यातील अतिवृष्टी व पुरपस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटूंबांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत आणि त्यांच्या पुनर्वसनाबाबत तसेच ग्रामीण भागातील पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

या यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या तपशीलावरुन संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली. 

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1077

नुकसानीबाबत काही शंका असल्‍यास टोल फ्री क्रमांक 1077 आणि पुणे येथील आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक 020- 26123371 येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com