#PuneFlood पोट भरू की घरातील वस्तूंची राखण!

yerawada
yerawada

येरवडा - घरात चिखलाचे साम्राज्य. त्यामुळे तुटक्‍या फुटक्‍या संसाराला सोडून जाता येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जायचे की या संसाराच्या वस्तूंची राखण करत बसायचे, ही व्यथा आहे कचरावेचक लक्ष्मी लंकेश्‍वर यांची.

मुळा-मुठा नदीकाठावरील डॉ. चिमा उद्यानाशेजारी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे कुटुंबांनी कर्नल यंग विद्यालयात आश्रय घेतला आहे. लंकेश्‍वर म्हणाल्या, ‘मी कोरेगाव पार्क येथे घंटा गाडीवर कचरावेचक म्हणून काम करत आहे. गेली कित्येक वर्षे नदी काठावर राहत आहे. पुराचे पाणी गेल्यामुळे सर्व संसार पाण्यात गेला.

महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात जाणाऱ्या मुलीला कोरेगाव पार्कला भावाकडे ठेवले असून, दोन मुलांसह कर्नल यंग विद्यालयात राहत आहे. मंगळवारी संध्याकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर घराची स्वच्छता करण्यासाठी आले; मात्र घरात सर्वत्र पसरलेला चिखल पाहून त्या हाताश झाल्या. घर साफ करू की दुसऱ्या दिवशी कामाला जाऊ.’

तसेच परिसरात राहणाऱ्या आशा खंडागळे, नंदा ढेरे, मंगल राजगुरू यांनासुद्धी स्वत:ची व पोरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जावे की घरातील वस्तूंची राखण करत बसावे, असा प्रश्‍न पडला आहे. 

नवीन घरातील सामान चोरीला  
लंकेश्‍वर यांना येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने हडपसर वैदू वाडीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातर्गत घर दिले होते. घरातील सामान नवीन घरात ठेवून कुलूप लावून त्या आल्या. दुसऱ्या दिवशी त्या राहण्यासाठी जाणार होत्या; मात्र नवीन घरी जाण्याअगोदरच घरातील सर्व सामान चोरीला गेले. ऐवढेच नव्हे तर घरातील विद्युत उपकरणे, वायरिंगसुद्धा चोरीला गेले. त्यामुळे परत जुन्या घरी आल्याचे लंकेश्‍वर यांनी सांगितले.

स्मशानभूमीत पाणी शिरल्याने दोन दिवसांनी अंत्यसंस्कार 
येरवडा : स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरल्याने दोन दिवसांनी मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ एका कुटुंबावर आली. गाडीतळ, मदर तेरेसानगर येथील शेटपाल वाल्मिकी यांचे रविवारी (ता. ४) सकाळी निधन झाले होते; मात्र स्मशानभूमीतील पाण्यामुळे सोमवारी (ता. ५) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे  मुळा-मुठा नदीकाठावरील सर्व स्मशानभूमी, दफनभूमित पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी अत्यंसंस्कार करणे कठीण होते. अत्यंसंस्कारांसाठी आलेल्यांची मोठी अडचण होत होती. त्यांना इतरत्र जाण्याशिवाय पर्याय नव्हता. काहींना पाणी ओसरण्याची वाट बघावी लागली. मदर तेरेसानगर येथील वाल्मिकी यांचे निधन रविवारी सकाळी झाले; मात्र स्मशानभूमीत सर्वत्र पाणी होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली. सोमवारी सायंकाळी पाणी ओसरल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आल्याचे आकाश घुमे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com