पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन पुण्याचे नवनियुक्‍त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पाटील यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार आज (ता.08) सायंकाळी स्वीकारला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, खरीप हंगामाच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत आयआयटीने 17 ते 22 जून या कालावधीत पाऊस सुरू होईल. तसेच, यंदा पावसाचे प्रमाण 94 टक्‍के राहील, असा अंदाज वर्तविला आहे. मी शहरातील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेत राहीन. नागरिकांना जून महिनाखेरपर्यंत पाण्याची अडचण येणार नाही.

नागपूर आणि मुंबईच्या तुलनेत पुण्यात मेट्रोचे कामाची गती कमी आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महापालिकेतील समाविष्ट गावांसह शहरालगतच्या पाच किलोमीटरपर्यंतच्या गावांमध्ये सध्या टॅंकर मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यावर पाणी हे पाईपलाईनेच दिले पाहिजे. टॅंकरने पाणीपुरवठा करणे योग्य नाही.शहरालगतच्या गावांना पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहर पोलिस दुचाकीस्वारांना चौका-चौकात अडवून हेल्मेटसक्‍तीची कारवाई करीत आहेत. याबाबत पाटील म्हणाले, पोलिस आयुक्‍त आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा
करून योग्य निर्णय घेऊ. पुणे खंडपीठाचा प्रश्‍न उच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यास राज्य सरकार आवश्‍यक पायाभूत सुविधा देण्यात कमी पडणार नाही. विमानतळाचा प्रश्‍न गतीने सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

विधानसभेच्या व्यूहरचनेवर लक्ष
खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या पालकमंत्री म्हणून खूप काम केले आहे. मी प्रशासनिक पालकमंत्री आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे त्याची व्यूहरचना कशी राहील, याकडेही माझे लक्ष असेल, असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असणार असल्याचे स्पष्ट केले.

नीरा देवधर धरणाच्या कालव्यातून सुरू असलेल्या वादावर पाटील म्हणाले, महाराष्ट्रात आता पाण्याचे वाद सुरू राहणार. या विषयावर सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे. ज्यांना सिंचनासाठी पाणी दिले, त्यांनी क्षेत्र वाढविले असून, त्यांचाही विचार करण्यात येईल. पाणी या विषयावर भांडण्याचे कारण नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन याबाबत प्रॅक्‍टिकली आणि कोणाचे नुकसान होणार नाही, असा निर्णय घेतील.

पुणेकरांशी घरोब्याचे संबंध
1982 पासून मी पुण्यात विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ केले आहे. पुण्याचा नियमित संबंध येत असल्यामुळे सर्वांशी परिचय नव्हे तर घरोब्याचे संबंध आहेत. पालकमंत्रीपदाची जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडेन, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com