पुणे - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "स्टॅंडअप इंडिया' या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 प्रमाणे 3600 नवीन उद्योजक निर्माण करणार आहोत. या योजनेसाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात "मार्जिन मनी'साठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे,'' असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी जाहीर केले.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रिजचे संस्थापक-अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत बडोले यांची 'डिक्की'च्या मुख्यालयात आज बैठक झाली. 'प्रत्येक जिल्ह्यातील निवडक 100 अनुसूचित जाती-जमातीच्या होतकरू आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर तरुणांची निवड केली जाईल. निवड झालेल्या 100 तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल; तसेच त्यांना कंपनी स्थापन करून देऊन प्रत्येकास एक प्रकल्प; तसेच प्रकल्प अहवाल तयार करून देण्यात येईल. त्याचबरोबर त्याला "स्टॅंडअप इंडिया' योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी साहाय्य करून त्याचा उद्योग उभा करण्यापर्यंतची मदत "डिक्की' ही संस्था करेल, असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.
हा संपूर्ण कार्यक्रम राजकुमार बडोले व "डिक्की'चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणार आहे. उद्योजक प्रशिक्षणाचा कार्यक्रम सामाजिक न्याय विभाग, "बार्टी', डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि "डिक्की' यांच्या वतीने होणार आहे. बैठकीला उद्योजक आणि "डिक्की'चे पदाधिकारी अविनाश जगताप, राजेंद्र गायकवाड, देवानंद लोंढे, सीमा कांबळे आदी उपस्थित होते.
|