सरकार केवळ घोषणाबाजीचेच - अजित पवार

अलका चौक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या वतीने काढण्यात आलेल्‍या हल्लाबोल आंदोलनात सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
अलका चौक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या वतीने काढण्यात आलेल्‍या हल्लाबोल आंदोलनात सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्ते.

पुणे - ‘‘नदी सुधारण्याची दिमाखात घोषणा झाली; मात्र वास्तवात मुळा-मुठा नदीला अद्याप घाणीने वेढले आहे. भामा आसखेड प्रकल्पातून पुणेकरांना पाणीदेखील मिळत नाही. याचाच अर्थ केंद्र आणि राज्य सरकार काम नव्हे, तर केवळ घोषणाबाजीच करीत आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी केली. महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुणेकरांनी मोठी साथ दिली; मात्र पुणेकरांचे महत्त्वाचे प्रश्‍न सोडविताना हे सरकार हात आखडता घेत असल्याचा ठपकाही त्यांनी या सरकारांवर ठेवला.

दोन्ही सरकारांच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यानिमित्ताने डेक्कन येथील लोकमान्य टिळक चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व पवार यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रूपाली चाकणकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, माजी आमदार बापू पठारे, कमल ढोले-पाटील, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

पवार म्हणाले, ‘‘निवडणुकीपूर्वी आश्‍वासनांची खैरात केलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्‍न सोडविण्यात सपशेल अपयश आले आहे. हे सरकार विकासाच्या नावाने गप्पा मारण्यात रममाण आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होत असून, सांगलीत तरुणाचा खून होणे, ही घटना सरकारच्या बोटचेपी धोरणाचाच परिणाम आहे.’’

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व घटकातील नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे शेतकरी, तरुण, नोकरदार आणि व्यावसायिक मंडळींमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पुणे शहराने खूप दिले; पण सरकारने पुणेकरांच्या समस्या सोडविल्या का नाहीत? जलसंपदामंत्री गिरीश महाजन जेथे-तेथे बंदूक घेऊन मिरवतात. त्यांना काय बिबट्याला मारण्याची परवानगी मिळाली आहे का? मंत्रीच कायदा हातात कसा घेऊ शकतात?’’ आदी प्रश्‍नही पवार यांनी उपस्थित केले.
चव्हाण म्हणाल्या, ‘‘दोन्ही सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात जनता एकवटली आहे. त्यामुळेच आंदोलनांना पाठिंबा मिळत असून, हा संघर्ष सुरूच राहील.’’

तातडीने शिक्षा करा
कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या निर्णयाचे अजित पवार यांनी स्वागत केले. या प्रकरणातील आरोपींना तातडीने शिक्षा मिळाली पाहिजे. ज्यामुळे असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही. त्यामुळे सरकार आता वेळ वाया न घालवता निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनात सक्रिय सहभाग
केंद्र आणि राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, या आंदोलनांमध्ये पवार हे देखील पूर्णवेळ सहभागी झाल्याचे दिसून आले. गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची मोठी पीछेहाट झाल्याने पवार यांनी लक्ष घालत असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com