'बोगस डिग्रीवाल्याकडे शिक्षण विभाग '

'बोगस डिग्रीवाल्याकडे शिक्षण विभाग '

पुणे - ""राज्याच्या मंत्रिमंडळात बरेचजण पदवीधर आहेत. स्वत: मुख्यमंत्री उच्चशिक्षित आहेत. असे असताना "बोगस डिग्री' घेतलेल्या माणसाकडे शिक्षण विभाग सोपविला. असा माणूस कसा काय हा विभाग सांभाळू शकतो,'' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली. शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत शिक्षण विभाग अजिबात गंभीर नाही. सर्वच संस्थाचालकांना ते दरोडेखोर म्हणत आहेत. एकूणच सगळी थट्टा सुरू आहे. त्यामुळे तक्रार करायला जायचे कोणाकडे अशी स्थिती आहे, असेही ते म्हणाले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वेगवेगळ्या विद्यालयांतील विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. खासदार वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, नगरसेवक चेतन तुपे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार मोहन देशमुख, संदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. त्यामुळे लाखो मुलांचे भवितव्य अंधारात आहे. शालेय पाठ्यपुस्तकात सोईचे धडे घातले जात आहे. इतका हस्तक्षेप यापूर्वी कधीही झाला नव्हता. शिक्षक भरती, लिपिक-सेवकांची भरती रखडली आहे. गोरगरिबांची मुले सोडून मंत्र्यांच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले जात आहे. शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न आहे. पोषण आहाराचे मानधन नीट मिळत नाही. अशा अनेक समस्या शिक्षण विभागात आहेत; तर दुसरीकडे या विभागातर्फे शिक्षक दिनसुद्धा वेळेवर साजरा होत नाही. शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण केले जात नाही. अशा प्रश्‍नांबाबत तावडे यांची भेटही घेतली; पण प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही.'' 

शिक्षण विभागातील समस्या सोडविण्याऐवजी एक दिवस फुटबॉल खेळा, असे सांगितले जाते. दहा लाख लोकांनी एकाच वेळी फुटबॉल खेळल्याने काय होणार? सरकार शिक्षकांना-विद्यार्थ्यांना विसरले आहे. 
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

सरकारची ही भाषा योग्य नाही 
""पेट्रोल, गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत प्रश्‍न विचारला तर "पेट्रोल भरू नका, किमती वाढल्याने लोक मरताहेत का', असे सांगितले जात आहे. सरकारची ही भाषा योग्य नाही. सरकारला लोकांचा विसर पडला. सोईचा प्रश्‍न विचारला नाही म्हणून पत्रकारांनाही ते दम देत आहेत,'' असे सांगत पवार यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com