शाळांविषयी पालकांनी अधिक सजग राहावे 

शाळांविषयी पालकांनी अधिक सजग राहावे 

कार्ले - ""मूल 6 वर्षांचे होईपर्यंत गर्भसंस्कार उपयोगी ठरतीलच; पण पुढे मुलाच्या शाळेत होणारे संस्कारही महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे शाळा कशी आहे, हेही मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. आज केवळ "व्यवसाय' म्हणूनही अनेकदा शाळांकडे पाहिले जाते. मात्र, अशावेळी पालकांनी अधिक सजग होणे आवश्‍यक आहे. आपली मुलं अधिक सक्षम आणि सन्मार्गाने चालणारी व्हावीत, यासाठी हे गरजेचे आहे,'' अशा शब्दांत श्री गुरू बालाजी तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

आत्मसंतुलन व्हिलेज येथे बुधवारी झालेल्या "गर्भसंस्कार पुरस्कार सोहळ्या'त श्री गुरू तांबे बोलत होते. "संतुलन आयुर्वेद' आणि "सकाळ'ने हा कार्यक्रम आयोजिला होता. इचलकरंजीचा मानव वेंकटेश चांडक आणि पुण्याची रिओना नितीन काटकर यांना मुख्य पुरस्कार; तर अकलूजची स्पृहा नीलेश थिटे आणि कुवेतची मृणाल प्रकाश पाटील यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

श्री गुरूंच्या अठ्ठ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम झाला. स्त्रीरोगतज्ज्ञ व लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. वीणा तांबे, "सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सुनील तांबे, डॉ. मालविका तांबे, डॉ. भाग्यश्री झोपे, "सकाळ'च्या फॅमिली डॉक्‍टर पुरवणीचे समन्वयक संतोष शेणई या वेळी उपस्थित होते. 

श्री गुरू तांबे म्हणाले, ""समाजात जी निराशामय अवस्था दिसून येते, ती नाहीशी करून अधिक सकारात्मक आणि सर्जनशील पिढी निर्माण करताना चांगले संस्कार महत्त्वाचे ठरतात. आपल्या मुलाने पुढे देशाचे नाव मोठे करावे किंबहुना संपूर्ण मानवजातीसाठी काही करावे, हे पालकांनी विचारात घ्यायला हवे.'' 

डॉ. संगमनेरकर म्हणाले, ""समाजात आज स्वास्थ्य आढळून येत नाही, कारण संस्कार राहिलेले नाहीत. दुसऱ्याला आनंद देऊन त्यातून आपण आनंद घेणे, 

हे आज क्वचितच दिसून येते. ते वाढायला हवे. त्यात आयुष्याचा खरा आनंद आहे. सध्या उशिराच्या वयात होणाऱ्या गर्भधारणेचे प्रमाण वाढते आहे. शिक्षण आणि करिअर यामुळे लग्नाचे वय वाढत चालले आहे. करिअरच्या मागे जरूर लागा; पण योग्य वेळेत माता-पिता होता येणे, हे महत्त्वाचे आहे.'' 

दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री गुरूंची नात सुश्‍मिता तांबे हिने प्रार्थना सादर केली. त्यानंतर दृष्टी सोलंकी हिने नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या उत्साही आणि चैतन्यमय उपस्थितीमुळे संपूर्ण सभागृहातही आपसूक उत्साह संचारला होता. आपले आईबाबा आणि आजीआजोबांसह सर्व लहानग्यांनी या सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. यानंतर पुरस्कारांची निवड कशी करण्यात आली, याविषयी डॉ. मालविका तांबे यांनी माहिती दिली. गर्भसंस्कार पुस्तकामागील भूमिका व त्याची वाटचाल संतोष शेणई यांनी उलगडून सांगितली. अभिजित पवार यांनी आभार मानले. डॉ. मृण्मयी भजक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com