पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील सेवासुविधा आणि त्यासंबंधीच्या तरतुदीसंदर्भात चर्चा करण्यासाठी खास सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्थायी समितीकडे केली आहे. तसेच गावांच्या गल्लीबोळातील रस्ते, पाणी आणि वीज या सुविधांकरिता तातडीने आर्थिक तरतूद करावी, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर या गावांमधील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी पाहणी करून सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. नव्याने महापालिकेत आलेल्या गावांमधील सद्यस्थितीबाबत नगरसेवकांबरोबर चर्चा करण्यात आलेली नाही. केवळ खातेप्रमुखांशी चर्चा केल्याने प्रशासनाला नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर नव्या गावातील समस्यांवर चर्चा करून उपाययोजना आखण्यासाठी खास सभा बोलविण्यात यावी. येथील रहिवाशांना काही सुविधा पुरविण्याची गरज असून, त्यासाठी निधी उपलब्ध करावा, असेही भानगिरे यांनी म्हटले आहे.
|