खडकवासला धरणाची सीमाभिंत अर्धवटच

खडकवासला धरणाची सीमाभिंत अर्धवटच

प्रदूषणाबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

पुणे - पर्यटक धरणात उतरून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करू नये, यासाठी खडकवासला धरणास काही अंतरावर सीमाभिंत बांधण्यात आली. पण काही ठिकाणी भिंत फोडण्यात आली असून तेथून पर्यटक पाण्यात उतरत आहेत. त्यामुळे प्रदुषणाबरोबरच सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

स्थानिक रहिवासी संतोष पाटील म्हणाले, ‘‘धरणाच्या कडेला सुमारे तीस ते चाळीस हॉटेल व्यावसायिक आहेत. चौपाटीवर छोटे व्यावसायिक आहेत. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून उरलेले खाद्यपदार्थ, थर्माकोल, प्लास्टिक आणि मद्याच्या बाटल्या धरणात फेकल्या जातात. विशेषतः धुळवड आणि रंगपंचमीच्या दरम्यान पर्यटक पाण्यात उतरल्यामुळे पाणी प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असते. पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रदूषण जास्त होत आहे.’’

जलसंपदा विभागाचे तत्कालीन वरिष्ठ अभियंता अतुल कपोले म्हणाले, ‘‘धरणाच्या कडेला मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. बॅकवॉटर परिसरात चौपाटी, हॉटेल, बियरशॉपीचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांकडून विविध प्रकारचा कचरा थेट धरणात टाकला जातो. त्यामुळे जलसपंदा विभागाने धरणाच्या भिंतीलगत मोठी सीमाभिंत बांधली आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु व्यावसायिक आणि पर्यटकांनी धरणाच्या पाण्यामध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून सातत्याने केले जाते. त्याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी गस्तीवर असतात.’’

स्थानिक लोकांकडून उपजीविकेसाठी धरणक्षेत्रातील बॅकवॉटर परिसरात पाणी ओसरल्यानंतर शेती केली जाते. तसेच चौपाटीवर व्यवसाय उभारले आहेत. त्याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. कचरा थेट पाण्यात टाकल्यामुळे प्रदूषण वाढते. सुरक्षितता आणि खबरदारीसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com