पुणे - 'पैसा व पदाच्या जोरावर ब्राह्मण्यवाद सध्या बहुजनांवर वर्चस्व गाजवीत आहेत. काही मूठभर लोक तुमच्याविरुद्ध कारवाया करत आहेत. त्यामुळे आता मान-अपमान सोडून ब्राह्मण्यवाद संपविण्यासाठी बहुजनांनी एकत्र आले पाहिजे. कारण, प्रश्न मानापमानाचा नाही, तर उद्याच्या जडणघडणीचा आहे. सत्यशोधक चळवळ पुन्हा एकदा ज्वलंत करून चळवळीत सर्वांना बरोबर नेण्याचा विचार आता करा,'' असा सूर मराठा अस्मिता परिषदेत बुधवारी उमटला.
सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे डॉ. मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावरून "मराठा अस्मिता परिषद' भरविण्यात आली होती. परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, डॉ. भारत पाटणकर, टेक्सास गायकवाड, मराठा महासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, राहुल पोकळे, निर्मला यादव आदी सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय व्यवस्थेवर डॉ. आढाव यांनी टीका केली. ते म्हणाले, 'खोले यांनी यादव यांचे पैसे देण्याचेही कष्ट घेतले नाहीत. पोलिसांना खोले यांची तक्रार दाखल करता येते, मग यादव यांची तक्रार का घेत नाही? यावरून विषमता ही आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिकही असल्याचे स्पष्ट झाले. संकुचित वृत्ती सोडून अन्य जाती-धर्मांना बरोबर घेण्याचा विचार केला पाहिजे. सत्यशोधक चळवळीची वाट आता धरली पाहिजे.''
मोदी सरकार पुन्हा आले, तर तुमच्या जमिनी राहणार नाहीत, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली. ते म्हणाले, 'ब्राह्मणवाद्यांकडून पैसा व पदाची लालसा
दाखवून माणसांना त्यांच्याकडे ओढण्याचे काम केले जाते. मराठ्यांचे मुख्यमंत्री अनेकदा झाले, मात्र त्यांनी आरक्षणाचा प्रश्न संपविला नाही. राणे कमिटी बोगस आहे. त्यांना मराठा आरक्षणाचे काही कळत नाही. मराठा मोर्चामुळे दलित, ओबीसींसह सर्व जाती दुखावल्या. ते सर्व बाजूला ठेवून एकत्र येऊ.''
डॉ. पाटणकर म्हणाले, 'मराठ्यांमध्ये अंतर्गत रोटीबेटीव्यवहार होत नाहीत. त्यामुळे मराठ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. स्वतःला क्षत्रिय म्हणताना आपण चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य करतो, हे स्पष्ट होते. मराठ्यांनी जातीअंताची लढाई हाती घ्यावी.'' गायकवाड, यादव यांनीही मनोगत व्यक्त केले.
खेडेकर म्हणाले, 'ब्राह्मण्यवाद्यांकडून मराठा समाजाची वेळोवेळी तपासणी झाली आहे. देशातून कागदावरून मनुस्मृती गेली, मात्र प्रत्यक्षात जगण्यात आजही ती अस्तित्वात आहे. महिलांचा मान ठेवा, त्यांचा सन्मान करा. राज्यघटनेला सर्वोच्च स्थानी मानून हजारो वर्षे टिकतील, असे आपले कायदे तयार करा.'' संतोष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
|