‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडचे काय?

‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडचे काय?

केंद्र सरकारने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडचा समावेश भारतमाला प्रकल्पामध्ये केला आहे. ही बातमी पुणेकरांसाठी आनंदाचीच आहे. यामुळे गेल्या वीस वर्षांहून अधिककाळ रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे; परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोड अद्याप कागदावरच राहिला आहे. त्याच्या कामाला देखील गती मिळावी, यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याची गरज आहे. भविष्यातील गरज ओळखून हा रिंगरोड मार्गी लावणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

देशातील महाराष्ट्र आणि त्यातही पुणे हे सर्वाधिक वेगाने विस्तारणारे शहर म्हणून ओळखले जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावरील ताण कमी करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने ‘पीएमआरडीए’ची स्थापना केली. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळाली आहे. वाहतुकीचा प्रश्‍न सर्वांत कळीचा बनला असून, तो सोडविण्यासाठी आणि भविष्याचा विचार करून प्रादेशिक आराखड्यात रिंगरोडची संकल्पना मांडली गेली. ती पूर्णत्वास येण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला.

दरम्यानच्या काळात दोन्ही महापालिकांच्या हद्दीलगतच्या गावांचा विस्तार झाल्याने ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रिंगरोडकडे कोणीच गांभीर्याने पाहिले नाही. अखेर ‘पीएमआरडीए’नेच यासाठी पुढाकार घेतला.

त्याच वेळेस ‘एमएसआरडीसी’ने देखील रिंगरोडचे काम हाती घेतले असून, त्यासाठी आठ कोटी रुपये खर्च करून अमेरिकन कंपनीला रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम दिले. प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोड सोडून कंपनीने रिंगरोडची नव्याने आणखी केली. ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडपासून काही किलोमीटर अंतरावरून हा रिंगरोड जातो. त्यामुळे कोणत्या रिंगरोडचे काम करावे, यावरून पीएमआरडीए आणि एमएसआरडीसी या संस्थांमध्ये वाद सुरू झाला. त्यात पीएमआरडीएनेच बाजी  मारली.

‘एमएसआरडीसी’चा रिंगरोड अद्याप सर्वेक्षणाच्या पातळीवर राहिला आहे. वास्तविक भविष्याचा विचार करता हे दोन्ही रिंगरोड होणे महत्त्वाचे आहे. हे दोन्ही प्रकल्प कसे मार्गी लागतील, या दृष्टीने प्रयत्न होण्याऐवजी कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. आज ना उद्या ‘पीएमआरडीए’च्या हद्दीचा विकास होईल. त्यामुळे दुसऱ्या रिंगरोडचेही काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने शहरासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com