शेतकरीपुत्रांच्या लग्नाचा प्रश्न बनला गंभीर

Pune News agrowon conducted survey on farmers marriage issue
Pune News agrowon conducted survey on farmers marriage issue

सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष : ४५ गावांत ३०६८ तरुण मुलांची लग्ने रखडली

पुणे (प्रतिनिधी) : शेतकरी आंदोलन, शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरवस्था झाल्याने शेतकरी कुटुंबांत किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे भयावह वास्तव एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व लेखक हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठलराव शेवाळे यांनी नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यांत ४५ गावांत सर्वेक्षण केले, तेव्हा शेतकऱ्यांची लग्न रखडलेली ३०६८ तरुण मुले आढळली. त्यात ७७४ मुलांची वये ३१ ते ४० च्या दरम्यान आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने व शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याचा परिणाम शेतकऱ्याची कुटुंबसंस्थाच उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे वास्तव या सर्वेक्षणाने पुढे आले आहे. विशेष म्हणजे यात सर्व जातीचे शेतकरी आहेत. या सर्वेक्षणाला पूरक म्हणून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील १० गावांची पाहणी केली असता तिथेही तेच चित्र दिसले. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात कमी- अधिक संख्येने हेच वास्तव असल्याचे जाणवते, याकडे श्री. कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

या सर्वेक्षणाबाबत श्री. कुलकर्णी यांनी ‘सकाळ- ॲग्रोवन’ला दिलेला तपशील असा : शेतकरी आंदोलन मागील महिन्यात सुरू झाल्यावर शेतकरी कार्यकर्ते रोहिदास धुमाळ यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या लक्षात ही समस्या आणून दिली व काही गावांत नेऊन हा प्रश्न दाखविला. सुरवातीला यावर त्यांचा विश्वास बसला नाही, तेव्हा नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यातील ४५ गावांत हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे यांनी सर्वेक्षण केले. तेव्हा २५ ते ३० वयोगटातील २२९४ तरुण मुले व ३१ ते ४० वयोगटातील ७७४ तरुण मुले आढळली. यातील बहुसंख्य मुले अल्पभूधारक असून शिक्षणही चांगले आहे. अनेक जण पदवीधर आहेत. ४ मुले एम.बी.ए. झालेली असून, बेरोजगार असल्याने व शेती करीत असल्याने लग्न रखडले आहे. ३० वयोगट उलटलेल्यांनी तर आता लग्नाची आशाच सोडून दिली आहे. दोन मोठ्या गावांत तर ३०० व २५० मुले सापडली, तर १०० पेक्षा जास्त मुले आढळलेलीही १२ गावे आहेत. ५० पेक्षा जास्त मुले असलेली ८ गावे आहेत. केवळ अल्पभूधारकच नव्हे, तर अगदी १० एकर जमीन असलेल्या कुटुंबातही लग्न होत नसल्याचे दिसून आले. एका कुटुंबात तर ६० गुंठे जमीन असल्याने ३ मुलांची लग्नं रखडल्याचे भीषण वास्तव दिसल्याचे हेरंब कुलकर्णी व विठ्ठल शेवाळे यांनी सांगितले.

२०१२ चा दुष्काळ बनला कर्दनकाळ
गावकऱ्यांशी बोलल्यावर हे वास्तव गेल्या ४ वर्षांत अधिक गडद झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जातींतील मुले यात असल्याने आता शेतकरी हीच एक जात असल्याचे लक्षात आले. लग्न रखडण्याची अनेक कारणे या सर्वेक्षणातून पुढे आली. त्यात २०१२ चा दुष्काळ व त्यानंतर सतत भाव पडण्याची प्रक्रिया, वाढलेला उत्पादन खर्च यातून शेतीवर जगणे अधिक कठीण झाले. परिणामी शेतकरी बाप आपल्या मुलीला अजिबात शेतकरी कुटुंबात द्यायचे नाही, या निष्कर्षावर आले आहेत. मुलीही माहेरी बघितलेले शेतीचे हे भयावह वास्तव व त्यात करावे लागणारे जनावरासारखे कष्ट यामुळे लग्न करून शेतकरी कुटुंबात जायला उत्सुक नाहीत. पूर्वी मुली वडिलांच्या पुढे निर्णयात जात नसत, पण एकूणच मुलींची संख्या कमी झाल्याने मुलींना मागणी वाढली. त्यात ८ वी पर्यंत नापासी नाही व बोर्डाच्या सोप्या परीक्षा, गेल्या १० वर्षांत गावोगावी झालेले ज्युनिअर कॉलेज, बालविवाह थांबविण्याची झालेली चळवळ व जागृती यामुळे मुली सहज आज १२ वी पर्यंत शिकू लागल्या. त्यातून अधिक चांगल्या जीवनाची तयार झालेली आकांक्षा, शहरी महिलांशी होणारी तुलना, यातून व्यक्तिमत्त्व विकासाची व चांगल्या जीवनशैलीची आस तयार झाली. त्यामुळे शिकलेल्या मुली नोकरदार व शहर याला प्राधान्य देऊ लागल्या व त्यातून हे वास्तव तयार झाले.

लग्नासाठी तात्पुरती नोकरी
एक शेतकरी म्हणाला, की आज खेड्यात १० एकर असण्यापेक्षा तालुक्याला १० बाय १० चे दुकान असले तर लवकर लग्न होते. त्यातून अनेक गावांत लग्नाच्या मुलांना सहकारी संस्थांत लग्न होईपर्यंत नोकरीला ठेवा, अशी गळ घालणारे कार्यकर्ते आहेत, तर अनेक तरुण सिन्नर, चाकण येथील कारखान्यांत लग्न जमेपर्यंत नोकरी मिळवायची धडपड करीत आहेत. एका कुटुंबात नोकरी करणाऱ्या धाकट्या मुलाचे लग्न झाले व मोठ्या मुलाचे लग्न राहिले, अशी विषण्ण स्थिती बघण्यात आली. या वर्षी झालेल्या लग्नात शेतकरी मुलांची किती लग्नं झाली? असा नेमका प्रश्न विचारला, तेव्हा ती संख्या जवळपास नाही अशीच आढळली. एका गावात एकूण २७ लग्नं या वर्षी झाली, त्यात फक्त २ लग्ने झाली व तीही नात्यातील होती. पिंपळगाव देपा येथील ज्ञानेश्वर उंडे यांनी सांगितले, की मी दरवर्षी १०० लग्ने कित्येक वर्षे जमवली आहेत, पण गेल्या ३ वर्षांत एकही लग्न मी जमवू शकलो नाही. या तीन वर्षांत एकाही मुलीचा बाप माझ्याकडे आला नाही. पण, मुलांचे बाप मात्र विचारत आहेत. महाराष्ट्रात इतरत्र चित्र कसे आहे, हे बघण्यासाठी काही मित्रांना विनंती केली तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील सतीश करंडे (४ गावे), पुणे जिल्ह्यातील विठ्ठल पांडे (४ गावे) व शेवगावचे उमेश घेवरीकर (२ गावे) यांनी पाहणी केली. तेव्हा या १० गावांत ३१९ मुलांची लग्ने रखडल्याचे आढळले. त्यामुळे कमी- अधिक प्रमाणात महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात पाहणी केल्यास हेच चित्र पुढे येईल, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या वेदनेचा बाजार
या शेतकरी अगतिकतेतून अनेक विधायक आणि विघातकही गोष्टी घडत आहेत. विधायक बाबींत मुलीच्या बापाचे लग्नातील शोषण कमी होत आहे. हुंडा प्रथा कमी होते आहे. अनेक ठिकाणी मुलाकडच्यांनी लग्न करून मुली आणल्या आहेत. विधवा व परित्यक्ता, अनाथ आश्रमातील मुली यांच्याशी लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे. नाशिक, यवतमाळ, ठाणे या भागातील आदिवासी भागांतील मुलींशी आंतरजातीय विवाह करण्याचीही अल्प पण लक्षणीय उदाहरणे आढळली, हे सकारात्मक पैलू आहेत. तर, अडलेल्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेणारे एजंटही निर्माण झाले आहेत. अगदी मुली दाखविण्याचे ५००० रुपये घेणे, इतर जिल्ह्यातील मुलीशी लग्न लावून देणे, असे उद्योग ते करतात. यातून अनेकांची फसवणूकही झाली आहे. शेतकऱ्यांच्या वेदनेचा असा बाजार मांडला जातो आहे.

स्थलांतर वाढले
जिरायती गावांत तर हा प्रश्न खूप गंभीर होतो आहे. त्यातून गावाबाहेर व शेतीबाहेर पडण्याची मानसिकता तयार होते आहे. सारोळा पठार या दुष्काळी गावातील ३०० कुटुंबांतील ४१२ मुले गावाबाहेर नोकरी किंवा व्यवसायाला गेली असल्याचे प्रा. दिलीप पोखरकर यांनी लक्षात आणून दिले. वाढते नागरीकरण हे उद्ध्वस्त होणाऱ्या शेती धंद्यातून तयार झाल्याचे हे वास्तव अधोरेखित करते. बागायती गावांत हा प्रश्न नसेल असा समज होता, पण अनेक बागायती व प्रतिष्ठित असलेल्या गावांतही हा प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात आले. यावर दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे शेतीमालाला भाव देऊन शेती करण्यातली प्रतिष्ठा उंचावणे हाच आहे, याकडे अनेकांनी लक्ष वेधले. प्रगतिशील उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर यांनी परभणी जिल्ह्यातील एक गाव व त्यांचे गाव अशी गाव ते गाव सोयरिक करण्याचा प्रयत्न केला होता. असेही प्रयत्न व्हायला हवेत. निराश होत असलेल्या या मुलांचे समुपदेशन करणेही आवश्यक आहे.
या सर्वेक्षणासाठी रोहिदास धुमाळ, शांताराम गजे, नीलेश तळेकर, दिलीप पोखरकर, विनोद हांडे यांचे सहकार्य लाभल्याचे श्री. कुलकर्णी यांनी आवर्जून नमूद केले.

अधिक माहितीसाठी संपर्क :

  • हेरंब कुलकर्णी : ९२७०९४७९७१
  • विठ्ठलराव शेवाळे : ९३७२०१२२२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com