"सेन्सॉर'मुळे "शोले'चा शेवट बदलला 

"सेन्सॉर'मुळे "शोले'चा शेवट बदलला 

पुणे - "सेन्सॉर' बोर्डाच्या "कट'विषयी कोणीच खूष नसते. कलाकारांसाठी "सेन्सॉर'चा प्रश्‍न कालही होता आणि आजही आहे, त्यामध्ये बदल झालेला नाही. "सेन्सॉर'मुळे मला "शोले'चा शेवट बदलावा लागला होता,'' अशी टीका ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शुक्रवारी केली. सिप्पी यांनी "अरे ओ सांबा, कितने आदमी थे' हा गब्बर सिंगचा "डायलॉग' मारत "शोले' चित्रपटाच्या निर्मितीचा आणि त्याला मिळालेल्या यशाचा प्रवासही उलगडला. 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) उद्‌घाटन सोहळ्यामध्ये सिप्पी यांना "असामान्य योगदान पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी सिप्पी यांच्याशी संवाद साधला. 

"शोले' या चित्रपटासह "सागर', "अंदाज' व "सीता और गीता' या चित्रपटांचा प्रवासही सिप्पी यांनी सांगितला. सिप्पी म्हणाले, ""यशस्वी होण्यासाठी कोणताही "फॉर्म्युला' नसतो, "शोले'च्या वेळी आम्ही यशाचा विचार केला नव्हता. इतर कोणत्याही कलाकाराप्रमाणे "शोले'च्या मागे असणाऱ्या प्रत्येकाने चांगला चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला रसिकांनी प्रेम दिले. "अंदाज' व "सीता और गीता' नंतर काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होतो. त्या वेळी सलीम जावेद यांच्याकडे चार ओळींची संकल्पना होती. ती संकल्पना आम्ही फुलविली आणि त्यातूनच "शोले'चा जन्म झाला.'' 

सिप्पी म्हणाले, ""वडिलांबरोबर चित्रपटाचे चित्रीकरण असो किंवा संगीत, सगळीकडे मी जात असे. तेथील वातावरण मला भारावून टाकत असे. आर. डी. बर्मन यांच्या घरी आम्ही अनेकदा गेलो. एकदा लता मंगेशकर यांना तेथेच पहिल्यांदा पाहिले. मला विदेशी चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. त्यातूनच लहानापासून मी विदेशी चित्रपट खूप पाहिले, त्यामुळे "ऍक्‍शन' व "ऍडव्हेंचर'कडे माझा कल होता. ते "शोले'तून तुम्ही पाहिले. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक समस्या पूर्वीप्रमाणे आजही आहे. चित्रपट निर्मितीसाठी तंत्रज्ञानापेक्षा आवड जास्त महत्त्वाची आहे.'' 

""प्रसारमाध्यमांनी दाखविलेला रस्ता समाज पाहत असतो. त्यामुळे योग्य मार्ग दाखविण्याची प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे. प्रसारमाध्यमांनीही आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याची गरज आहे.'' 
रमेश सिप्पी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com