‘स्वयंसिद्धा’ हाकतेय संसाराचा गाडा

women
women

पुणे - ‘तुला झालेल्या मुली माझ्या नाहीत’, असा आरोप करीत पती घटस्फोटासाठी न्यायालयात गेला. त्यामुळे आता आपले काय होणार, या प्रश्‍नाने पत्नी हतबल झाली. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत आलेले चांगले अनुभव, ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमातील मार्गदर्शन आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी मरगळ झटकून आत्मविश्‍वासाने पुन्हा उभी झालेली पत्नीच आता कुटुंबाचा गाडा हाकत आहे.

कौटुंबिक वादातून पतीच्या त्रासाला कंटाळून बऱ्याचदा महिला घर सोडून जातात व नंतर घटस्फोट घेतात. मात्र अंजली यांनी धीर न सोडता पुन्हा संसार करण्याची जिद्द कायम ठेवली. अखेर त्यात त्यांना यश आले व आता त्या अत्यंत चांगल्या प्रकारे घर चालवत आहेत. एवढेच काय तर त्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावताहेत. अंजली आणि सुरेश (दोन्ही नावे बदलली आहेत.) यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. वाद विकोपाला गेल्यानंतर सुरेश यांनी दोन्ही मुली माझ्या नाहीत, असे म्हणत घटस्फोटाचा दावा दाखल केला. नोटीस मिळाल्यानंतर अंजली घाबरून गेल्या. दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांच्यावर होती. सुनावणी सुरू झाल्यानंतर एका तारखेला त्यांनी धीर करून न्यायालयातच पतीवर प्रश्‍नांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर त्यांनी कौटुंबिक न्यायालयातील ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमात सहभाग घेतला. या दोन्ही बाबींमुळे त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढत गेला. त्यामुळे काहीही झाले तरी मी पुन्हा संसार करणारच, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. 

मुलींसाठी वडील म्हणून या
एक दिवस त्यांनी मुलींना पतीला भेटायला नेले. ‘तुमच्यात हिम्मत नसेल तर मी तुम्हाला नांदवते; पण तुम्ही मुलींसाठी वडील म्हणून घरात थांबा,’ असे त्यांनी त्याला सांगितले. त्यानंतर दोघांमधील वाद हळूहळू कमी झाले. तसेच पतीला कसे जिंकायचे, याचा आत्मविश्‍वास त्यांच्यात निर्माण झाला. सुरेश देखील अंजली यांना आता प्रत्येक वेळी पाठिंबा देत आहे. 

शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये, अशी म्हण आपल्याकडे आहे. मात्र न्यायालयाची पायरी चढल्यानंतर मला माझा संसार आणि आत्मविश्‍वास परत मिळाला. समुपदेशकांनी आम्हाला मार्गदर्शन केले नसते, तर आम्ही असेच भांडत राहिलो असतो. 
- अंजली 

वस्तुस्थितीचा विचार करून परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिल्यास कुटुंब जोडण्यात यश मिळू शकते, असा विश्‍वास अंजली यांच्यात निर्माण केला. वस्तुस्थितीला सामोरे गेल्यास कुटुंब संस्थेला तडा जाऊ शकत नाही. जोडप्यात कितीही वाईटपणा आला तर शांतता ठेवली पाहिजे. 
- राजेंद्र ततार, ज्येष्ठ विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय

काय आहे स्वयंसिद्धा उपक्रम?
घटस्फोटीत किंवा पतीपासून विभक्त झालेल्या महिलांना समाजात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या महिलांना सक्षम करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाने स्वयंसिद्धा हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून संबंधित महिलांचे समुपदेशन करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com