पुणे - राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयांत "शून्य प्रलंबिता अभियान' (झिरो पेंडन्सी) राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या 15 दिवसांमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांचे 10 हजार 656 विनावाद बदलअर्जांचा निपटारा करण्यात आला आहे.
नोंदणीकृत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व धार्मिक संस्थांचे हजारो बदलअर्ज वर्षानुवर्षे धर्मादाय कार्यालयाकडे प्रलंबित होते. हे अर्ज निकाली काढण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सर्व कार्यालयांमध्ये "झिरो पेंडन्सी' मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर व अमरावती या आठ विभागांच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये मुंबई विभागात दोन हजार 92 अर्ज, पुणे दोन हजार 597, नागपूर 705, अमरावती 910, नाशिक तीन हजार 876, कोल्हापूर एक हजार 417, औरंगाबाद 659, लातूर 400 असे एकूण 10 हजार 656 बदलअर्ज निकाली काढले आहेत; तर पुढील 15 दिवसांमध्ये उर्वरित विनवादातीत बदलअर्जांचा निपटारा करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती पुणे विभागाचे धर्मादाय उपआयुक्त शेखर गोडसे, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.
|