Pune Rains : पूर ओसरला; पण संकट कायम

pune-floods-encroachment
pune-floods-encroachment

पुणे - लोकवस्त्यांतून वाहणाऱ्या २० किलोमीटर लांबीच्या नाल्यांमुळे पुराचे संकट ओढावूनही ते रोखण्यासाठी महापालिकेने नाल्यांलगत सीमाभिंती उभारण्यापलीकडे काहीच केलेले नाही. त्या पलीकडे आणखी ६६ किलोमीटरच्या नाल्यांवरील अतिक्रमणेही पुराला कारणीभूत ठरण्याची भीती आहे. अशा प्रकारे जवळपास ८६ किलोमीटर नाले अजूनही धोकादायक असल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. 

पुण्यातील ओढ्या-नाल्यांचे मार्ग, स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महापालिकेने २००६-०७ मध्ये खासगी संस्थेमार्फत ओढ्या-नाल्यांची पाहणी केली. त्यात शहर आणि उपनगरांत सुमारे ३६२ किलोमीटर लांबीचे २३४ नाले असल्याचे आढळून आले. मात्र, त्यापैकी काही नाल्यांतून पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. लोकवस्तीतून वाहणाऱ्या २० किलोमीटरच्या नाल्यांच्या परिसरात वारंवार पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही संबंधित संस्थेने स्पष्ट करीत उपाययोजना करण्याची सूचना महापालिकेला केली होती. 

गेल्या आठवड्यांत ओढ्या-नाल्यांच्या रौद्ररूपामुळे २५ जणांचा जीव गेला, तर हजारो घरांचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर संबंधित संस्थेच्या सूचनेनुसार महापालिकेने काय कार्यवाही केली, याची चर्चा सुरू आहे. 

महापालिकेचे अधिकारी अनभिज्ञ
ज्या ओढ्या-नाल्यांतील पाणी लोकवस्त्यांत शिरून २५ जणांचा जीव घेतला; ते ओढे-नाले नेमके किती आहेत, त्यांची लांबी किती, ते कुठे आणि कसे बुजविले व वळविले, याचा तपशील महापालिका प्रशासनाकडे सापडत नाही.  साधारणपणे १२ वर्षांपूर्वी सल्लागाराने केलेल्या पाहणीतील ओढ्या-नाल्यांचे आकडे दाखविण्यात येत आहेत; परंतु, गेल्या १०-१२ वर्षांत किती नाले वळविले, बुजविले, त्यावर कारवाई काय केली, हेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगता आलेले नाही. 

गाळ, कचऱ्यावर १०० कोटी खर्च
मुळा-मुठेच्या पात्रासह ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाल्यानेच पूरस्थिती निर्माण झाल्याची कबुली महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. तसेच, नाल्यांवर अतिक्रमणे असल्याचा अहवाल महापालिकेकडे आहे. त्यावर हातोडा उगारण्याकडे काणाडोळा करणाऱ्या महापालिकेने मात्र, नाल्यांतील कचरा-गाळ उपसण्यासाठी शंभर कोटींच्या घरात खर्च केला आहे. 

ज्या भागात नाले तुंबून पूरस्थितीचा धोका होण्याची भीती होती, त्यासाठी लोकवस्त्या आणि नाल्यालगत सीमाभिंती बांधल्या आहेत. ज्यामुळे पाणी रस्त्यावर येणार नाही.
- सुष्मिता शिर्के, कार्यकारी अभियंता, महापालिका

धोक्याची ठिकाणे 
धानोरी, कळस, येरवडा, विमाननगर, खराडी, मुंढवा (काही भाग), सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, कर्वेनगर, कोथरूड आदी 

पूर टाळण्यासाठी..
नाल्यांवरील अतिक्रमणे काढणे
वहन क्षमता कायम ठेवणे
नाल्यालगत पावसाळी गटारांचे जाळे उभारणे
वर्षातून तीन वेळा गाळ आणि कचरा काढणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com