
पुढच्या आठवड्यापासून रमजानचा महिना सुरू होत असल्याने या काळात पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे.
Electric Supply : रमजान महिन्यात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा
पुणे - पुढच्या आठवड्यापासून रमजानचा महिना सुरू होत असल्याने या काळात पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्यास नियोजन कोलमडून पडते. त्यामुळे महापालिकेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पत्र लिहून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी केली आहे.
शहरात होणाऱ्या असमान पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच जलशुद्धीकरण केंद्र किंवा पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फटका शहराच्या मोठ्या भागाला बसतो. शुद्धिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागणे, टाक्यांमध्ये कमी पाणी जमा होणे अशा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पूर्ण दाबाने पाणी पुरवठा न झाल्यास नागरिकांच्या अनेक तक्रारी येतात. यापूर्वी शहरात वीज पुरवठा खंडित होणे, यंत्रणेत बिघाड होणे आदी कारणामुळे पाणी पुरवठा विस्कळित झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
२२ मार्च पासून रमजान महिना सुरू झाला आहे. या काळात मुस्लीम समाजातील नागरिक उपवास करतात. या कालावधीत पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा, त्यात खंड पडू नये अशी सूचना राज्य शासनाने महापालिकेला दिल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाने एमएसडीसीएलच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून रमजानच्या महिन्यात वीज प्रवाह खंडित होऊ नये, तो सुरळीत राखण्यात यावा. यापार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश द्यावेत असे पत्र दिले आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.