आता मेंदूला खड्डे पडायची वेळ आली...

आता मेंदूला खड्डे पडायची वेळ आली...

पुणे - रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काय बोलायचे विचार करून आता मेंदूला खड्डे पडायची वेळ आली आहे...पुणे शहर खरंच ‘स्मार्ट’ होतय का ? सत्तेवर कोणीही आले तरी पावसाळ्यात खड्डे असतातच. खड्ड्यांच्या माध्यमातून अनेकांना पाठीचे - मणक्‍याचे आजार महापालिका भेट देत आहे...आकाशातील तारे ज्याप्रमाणे मोजता येत नाही तशीच अवस्था झालेल्या या खड्ड्यावर बोलायचे तरी किती... सिंहगड रस्ता भागातील नागरिक उमेश गोरे बोलत होते. गोरे यांच्याप्रमाणेच बहुतांश पुणेकरांची हीच भावना निर्माण झाली आहे. 

शहरातील बहुतेक रस्ते आणि प्रमुख चौक, उपनगरातील रस्ते, छोटे रस्त्यावर पडलेले खड्‌डे, हा गंभीर प्रश्‍न झाला आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत या खड्ड्यांची भर पडली आहे. खड्डे आणि त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक गती आणखी संथ झाली आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने खड्ड्यांसंदर्भातील याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीसंदर्भात त्रैमासिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या असून, त्यापैकी बहुतेक सूचनांनुसार पुणे महापालिका कार्यवाही करीत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. संततधार पावसामुळे खड्डे दुरुस्तीत मोठी अडचण येत आहे. ईमल्शनचा वापर करून खड्डे पावसाळ्यात बुजविले जात असले, तरी ईमल्शन वापरल्यानंतर अर्धा तास तरी त्यावर पाणी पडायला नको. त्यामुळे रस्ते दुरुस्तीत अडचण येत आहे. रस्त्यांची पाहणी करून काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक बसविण्यासारखे इतर पर्यायांचा वापर करून खड्डे बुजविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर विकास विभागाने रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीसंदर्भात सूचना पाठविल्या आहेत. खड्ड्यांसंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा, तक्रारदाराला तक्रारीवर केलेल्या उपाय योजनांची माहिती कळविण्यात यावी, महापालिकेच्या संकेतस्थळावर खड्ड्यांचे आणि दुरुस्तीनंतरचे, असे दोन्ही छायाचित्रे प्रसिद्ध करावी, तक्रार निवारणासाठी संबंधितांकडे 

पाठपुरावा करावा, तक्रार निवारण यंत्रणेविषयीची माहिती प्रसारित करावी, गटाराची झाकणे उघडी ठेवू नयेत, अशा विविध सूचनांचा यात समावेश आहे. नगर विकास विभागाने सूचना दिल्या असून, यासंदर्भात महापालिका प्रशासन आधीपासूनच काम करीत आहे, असे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी नमूद  केले.

विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या खोदाईच्या दुरुस्तीविषयी पुरेशा प्रमाणात योग्य कार्यवाही होत नाही. विविध प्राधिकरणे, संस्था, कंपनी यांच्याकडून खोदाई केल्यानंतर तेथे फलक लावणे, कामाचा कालावधी, ते पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याबाबतचा तपशील जाहीर करण्याची कार्यवाही पुढील कालावधीत केली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर  (अधीक्षक अभियंता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com