Pune : प्रेक्षकांसाठी विचारसरणीपेक्षा कलाकृतीचा दर्जा, रंजनमूल्य महत्वाचे ; सतीश आळेकर

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा उपक्रमात आळेकर यांनी साधला मुक्त संवाद
Pune
Punesakal

पुणे : प्रेक्षक हा एखाद्या विचारसरणीमुळे ती कलाकृती पाहतो असे नाही, तर संबंधित कलाकृतीमधील कलात्मकता व रंजकता सर्वसामान्य प्रेक्षकास कळते. कलाकृती चांगली असेल तर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळेल, पण त्यातील विचारसरणी त्यांना जवळची वाटेलचं असे नाही. म्हणूनच प्रेक्षकांसाठी विचारसरणीपेक्षा कलाकृतीचा दर्जा महत्वाचा ठरतो. असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नाट्य क्षेत्रातील मानाचा "विष्णूदास भावे पुरस्कार' आळेकर यांना नुकताच जाहीर झाला.त्यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे "सांस्कृतिक कट्टा' या उपक्रमाअंतर्गत आळेकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्वप्नील बापट, उपाध्यक्ष गणेश कोरे हे उपस्थित होते.

आळेकर म्हणाले, ""विचारसरणीने कलेची कास धरायची की नाही हा आजचा प्रश्न नाही. पूर्वीपासूनच देशात-परदेशात विचारसरणीच्या प्रचारासाठी कलेचा वापर होत आला आहे. कला ही प्रथम उत्तम कलाकृती असली पाहीजे. विचारसरणी ही तीच्या सौंदर्यातून व्यक्त व्हावी. जशी बर्टोल्ड ब्रेश्‍त, उत्पल दत्त यांची नाटके. प्रचारकी होता कामा नये.

पूर्वी माध्यमातून नाटक, चित्रपट यांचे दर्जेदार समीक्षण वाचायला मिळत असत. पण सध्या अशा प्रकारचे समीक्षण लिहिण्यासाठी त्या ताकदीची व्यक्ती आढळत नाही. मराठी पत्रकारांना समीक्षणाचे प्रशिक्षण देणारी संस्था नाही. महत्वाकांक्षा पुर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना नैराश्‍य येणे स्वाभाविक आहे, त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले पाहीजे, त्यांच्याशी संवाद वाढविला पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.

पारितोषिक महत्वाचे, पण अवलंबून राहू नये

पुरुषोत्तम करंडक हे एक व्यासपीठ आहे. त्याच्या काही चौकटी असतात. स्पर्धेच्या पारितोषिकाला महत्व आहे, पण केवळ त्यावर अवलंबून राहू नये. यंदा 2 वर्षांच्या कालांतराने ही स्पर्धा झाली. याकाळात मुले घरी बसून होती. सर्व काही ऑनलाईन होते. महाविद्यालयात आल्यावर स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे "सिनीयर्स' नव्हते. त्यामुळे नाटकाच्या दर्जात काही कमतरता राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, पण या क्षेत्रात काम करू इच्छीणाऱ्या मुलांनी हार मानून नाटक सोडू नये, तर नव्या जोमाने प्रयत्न करावे. अशा शब्दात आळेकर यांनी उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन दिले.

आता उदारमतवादीपणा कमी होतोय

फिल्म इन्स्टिट्यूट' सारखी मोठी संस्था चालविण्यासाठी लागणारी यंत्रणा देण्यात सरकार कमी पडत आहे. तसेच पूर्वी वेगवेगळ्या विचारासरणीचे लोक एकत्र राहत असले, तरी कोणीही आम्हाला हीच विचारसरणी योग्य, आणि तुम्ही तिच्याकडेच जा' असा आग्रह कोणी धरला नव्हता. त्यावेळी वातावरण अतिशय मोकळे होते. आता तो उदारमतवादीपणा कमी होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com