पुणे : ‘‘शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय व व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे. तसेच शेतीवर उपजीविका अवलंबून असलेली लोकसंख्या कमी करण्याची गरज आहे. मात्र राज्यकर्त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही,’’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
विनायक हेगाणा यांनी लिहलेल्या ‘शेतकरी आत्महत्या- शोध आणि बोध’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि शांतिवन संस्थेच्या संचालिका कावेरी नागरगोजे यांच्या हस्ते रविवारी (ता. १९) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’मधील (एमसीसीआयए) सुमंत मुळगावकर ऑडीटोरीयममध्ये पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यास आमदार कैलास पाटील, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, दीपक नागरगोजे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘ देशात ८५ टक्के अत्यल्पभूधारक शेतकरी असून, उत्पादन खर्च परवडत नसल्याने तुकड्याच्या शेतीवर उपजीविका होऊ शकत नाही. उसासारख्या ठरावीक पिकांचेच लाड केले जातात. कारण उसावर अवलंबून असलेल्या साखर कारखानदारीतून राजकारणात चांगली पकड मिळविता येते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अर्थ प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून मांडतो. राज्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँका व सेवा सोसायट्या मोडून खाल्ल्याने शेतकऱ्यांना पतपुरवठा होत नाही. सततची नापिकी, शेतमालाला भाव नसणे, अनुदानाची कमतरता,
शेतीपूरक जोडधंदा नसणे, लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे अर्थसंकल्पीय तरतुदींचा योग्य विनियोग न होणे, पर्यावरणीय बदलांचा फटका, अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकरी सुखी नसल्यास देशात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल आणि अन्नधान्यासाठी देशात रांगा लागतील.’’
गायकवाड म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्या हा विषय गुंतागुंतीचा असून, त्याचे निराकरण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी.’’ ‘या पुस्तकाच्या आधारे धाराशिव जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करू,’ असे कैलास पाटील यांनी सांगितले. कावेरी नागरगोजे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला व मुलांचे वास्तव मांडले. तर हेगाणा यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका सांगितली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.