पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना फसविलेः राजू शेट्टी

raju shetty
raju shetty

पुणेः सत्तेत येण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी "आम्हाला सत्ता द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू, त्यांच्या मालास हमी भाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू,' अशी आश्वासने दिली होती. आजपर्यंत त्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला नसून त्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी आज (सोमवार) केली.

महात्मा फुले वाडा ते मुंबई राजभवन असा 22 ते 30 मे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "आत्मक्‍लेष' यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरवात आज महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत तृतीयपंथीयांच्या नेत्या लक्ष्मी त्रिपाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, "स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अशा विविध मागण्यांसाठी पुण्यापासून आत्मक्‍लेष यात्रेला सुरवात झाली आहे. भविष्यात राज्यव्यापी जनआंदोलन उभारले जाणार असून येत्या 30 मे रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे. कर्जमाफीसोबत सातबारा कोरा करणे आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही. या आत्मक्‍लेष यात्रेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असून देखील त्यांनी अद्याप संपर्क साधलेला नाही. यातून या सरकारची संवेदनशून्य मानसिकता दिसून येत आहे,'' अशा शब्दात त्यांनी राज्यसरकारवर देखील निशाणा साधला.

तृतीय पंथी लक्ष्मी त्रिपाठी म्हणाल, "देशातील शेतकरी समाधानी नसून, त्यावर हे सरकार काही करताना दिसत नाही. तसेच निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार हे पंतप्रधानांनी जनतेला सांगितले होते. "अच्छे दिन आले पण ते फक्त अदानी आणि अंबानी यांनाच आले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम शेट्टी यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या यात्रेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्यावतीने आशिष पाटील म्हणाला, माझ्या वडिलांनी शेतीसाठी काढलेल्या कर्जामुळे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केली. मात्र, तुम्ही आत्महत्या करू नका. व्यसन करू नका,'' असे आवाहन त्याने उपस्थितांना केले.

सदाभाऊ खोत यांच्या भाजपप्रवेशावर बोलणे टाळले !
आत्मक्‍लेष यात्रेची सुरवात महात्मा फुले वाडा स्मारक येथील पुतळ्यांना अभिवादन करून करण्यात आली. या यात्रेमध्ये राज्यमंत्री मंडळातील राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सहभागाबद्दल तसेच कथित भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाबाबत विचारले असता, खासदार राजू शेट्टी म्हणाले, "लाखोंच्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते, विविध संघटना सहभागी झाले आहेत. त्यांना सोबत घेऊन ही यात्रा पूर्ण करणार,' असे सांगत सदाभाऊंविषयी बोलणे त्यांनी टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com