ऊर्जामंत्र्यांच्या नियोजनाअभावी भारनियमनाचे संकट; राजू शेट्टी

राजू शेट्टी यांचा आरोप; भोंग्याचे राजकारण थांबवून शेतकऱ्यांकडे लक्ष द्या
Raju Shetti
Raju Shettiesakal

पुणे : ‘‘राज्यात विजेचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक होत आहे. परंतु महावितरणने वीज खरेदीचे करार वेळेत न केल्यामुळे वीज भारनियमनाचे संकट ओढवले आहे. परिणामी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून, ऊर्जामंत्र्यांना नियोजन करता आले नाही,’’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले, ‘‘भोंग्यावरून राजकारण करण्यापेक्षा राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.

रात्री विजेच्या तारांचा शॉक आणि सर्पदंशांमुळे शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत. परंतु सरकारी नियमांमुळे त्यांना मदत मिळत नाही. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मानवी हक्क उल्लंघन होत असल्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वाहतुकीचे अनुदान ऊस उत्पादकांना द्यावे. तसेच, शेतकऱ्यांच्या शिल्लक उसाला अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर, बापूसाहेब कारंडे, अमरसिंह कदम, दिनेश ललवाणी आदी या वेळी उपस्थित होते.

विधान परिषद सदस्य होण्यात रस नाही

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहीत करताना कवडीमोल दर देण्याचा निर्णय घेतला. भूमी अधिग्रहण कायद्यातील बदलात शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पत्र सोनिया गांधी, शरद पवार यांना लिहिले. दोन महिन्यानंतरही त्याला साधे उत्तर दिलेले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडविले नाहीत. त्यामुळे आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडलो. आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य होणेही मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

किमान हमी भाव कायदा करावा

शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारलेल्या जलाशयातून साडेपाच हजार मेगावॉट वीज निर्मिती होते आणि शेतकऱ्यांना पाच हजार मेगावॉट वीज लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही समान वीज उपलब्ध व्हावी. तसेच, शेतकऱ्यांना किमान वेतन कायद्याच्या धर्तीवर शेतमालाला किमान हमी भाव द्यावा, याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा. त्यासाठी देशभरात ग्रामसभेचे ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.

कोल्हापूर निवडणुकीत पैशांचे वाटप

कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला. परंतु हा विजय त्यांचा नाही. निवडणुकीत राजकीय पक्षांनी पैसे वाटप केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मी टीका करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com