राजकीय कोपरखळ्या अन्‌ दिलखुलास उत्तरे

देहू - प्रा. रामकृष्ण मोरे व्याख्यानमालेत डॉ. उदय निरगुडकर यांनी आमदार रोहित पवार, सुनील शेळके यांची गुरुवारी मुलाखत घेतली.
देहू - प्रा. रामकृष्ण मोरे व्याख्यानमालेत डॉ. उदय निरगुडकर यांनी आमदार रोहित पवार, सुनील शेळके यांची गुरुवारी मुलाखत घेतली.

देहूत रंगली आमदार रोहित पवार आणि सुनील शेळके यांची मुलाखत
देहू - सध्याच्या राजकारणाच्या अस्थिर परिस्थितीत नव्याने आणि पहिल्यांदाच विधानसभेमध्ये युवा आमदारांचा प्रवेश झाला आहे. उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, मंत्रिमंडळात उच्च शिक्षितांना स्थान मिळावे का, या आणि अशा अनेक प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे आमदार रोहित पवार यांनी दिली.

चपखल उत्तरांनी त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. २०२४ च्या राजकारणात घराणेशाही नसलेले तसेच स्वतःच्या जनसंपर्कातून मोठे झालेले उमेदवार आमदार होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

येथील प्रा. रामकृष्ण मोरे स्मृती व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निडगुरकर यांनी आमदार रोहित पवार आणि सुनील शेळके यांची मुलाखत घेतली. 

त्या वेळी पवार म्हणाले, ‘‘या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला जनादेश मिळाला आहे. मात्र, युतीचे लोक भांडत आहेत, हे दुर्दैवी आहे. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास आम्ही चर्चा करू. मागील निवडणुकीत मोदी यांनी विकासावर चर्चा केली. मात्र, पाच वर्षांनंतर मतदारांना कळून चुकले. त्यांनी नोटाला पसंती दिली. 

अजित पवारांबाबत विचारलेल्या प्रश्‍नाबाबत ते म्हणाले, ‘‘पवार साहेबांवर ईडीने कारवाईची नोटीस बजावली तेव्हा अजित दादांच्या डोळ्यांत पाणी आले. पवार साहेबांनी त्यांच्यावर मुलासारखे प्रेम केले.’’ या व्याख्यानमालेत देहूतील ज्येष्ठ महिला मंगला टिळेकर, मंदाकिनी माळी यांचा आदर्श माता म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब भेगडे होते. सुनील कंद यांनी सूत्रसंचालन केले. उमेश टिजगे यांनी आभार मानले.

सुनील शेळके म्हणाले, ‘‘मावळच्या विकासासाठी मी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच कोणत्याही पक्षावर मी टीका केली नाही.’’ 

कर्जत जामखेड करणार बारामतीपेक्षा वेगळे - रोहित
‘बारामती मॉडेल कर्जतला करणार नाही. तर कर्जत जामखेडचे वेगळे मॉडेल तयार करणार आहे,’’ असे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले. ‘बरेच नेते पुणे, मुंबई येथे राहतात. आपण कोठून कंट्रोल करणार,’ या उदय निरगुडकर यांच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘‘कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक समस्या आहेत. काही भागात धान्य पोचत नाही. पाणी समस्या आहे. ७० टक्के समस्या कायम आहेत. त्यामुळे दोन दिवस पुणे, बारामती, दोन दिवस मुंबई व उर्वरित कर्जत असा मुक्काम राहणार आहे. एकंदर घराणेशाहीचा ठपका नको. स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची धमक घेऊन राजकारणात उतरलो आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com