रोहित पवार सभागृहात बोललेे अन् मतदारसंघातील जनता म्हणाली आमच्यासाठी तुम्हीच...

rohit.jpg
rohit.jpg

पुणे ः विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु असताना या चर्चेत सहभागी होऊन कर्जत-जामखेड या मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी मतदार संघातील अनेक प्रश्नांवर सभागृहाचे आणि पर्यायाने सरकारचे लक्ष वेधले.

दरम्यान, पीक विमा, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, कर्जमाफी, कृषी महाविद्यालयाचा प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांच्या वर्ग २ च्या जमिनींचा प्रश्न, वाळूउपसा, चारा छावण्यांचं अनुदान, रस्ते, जामखेड शहराचा पाणीपुरवठा तसेच गोदड महाराज मंदिर परिसराचा विकास असे प्रश्न रोहित पवार यांनी मांडले.

रोहित पवार यावेळी म्हणाले, ''फळबाग विमा योजनेतून लिंबू, पेरु आणि द्राक्ष यांना वगळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोणतंही पीक वगळू नये. तसेच विमा कंपनी आणि प्रशासन यांच्यातील तांत्रिक अडचणीमुळे २०१७-१८ सालच्या पिकविम्याची प्रलंबित रक्कम तातडीने द्यावी.''

अवकाळी पावसामुळे आणि पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. कुकडी, उजनी आणि सीना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी वर्ग २ च्या असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या जमिनींचे वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 

त्यांनी पुढे आपल्या भाषणातून राज्यात होणाऱ्या अवैध वाळू उपशाला आळा घालावा. तसेच नियमानुसार चालवलेल्या चारा छावण्यांचं प्रलंबित अनुदान देण्यात यावे आणि नियमभंग केलेल्या छावण्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकडेही सभागृहाचे लक्ष वेधले.

मागील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी, परंतु अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला नाही. शिवाय दिड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांन दिड लाखावरील कर्जाची रक्कम भरुनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली. 

त्यांना तातडीने पैसे देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्जतच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अन्यत्र जाण्याची गरज पडणार नाही. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या इमारतींची पुनर्बांधणी करावी आणि जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक गावांच्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. ग्रामविकास विभागाकडून याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, शिवाय कर्जतचे ग्रामदैवत असलेले संत श्री गोदड महाराज मंदिर परिसराचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणीही पवार यांनी केली आहे.

राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता यातील सर्वच प्रश्न लगेच चुटकीसरशी सुटतील अशी माझीही अपेक्षा नाही, परंतु यापैकी बहुतांश प्रश्न कसे सुटतील यासाठी आपण प्रयत्न करू असे पवार म्हणाले. महाआघाडीचं सरकार हे आपल्या सर्वांचंच सरकार असल्यामुळे हे सगळे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com