#SaathChal आपुलिया हिता प्रेमाचा ‘सकाळ’

SaathChal
SaathChal

वारी म्हटल्यावर आठवण येते पंढरीची. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउली आणि जगद्‌गुरू तुकोबारायांची. त्यांच्या पालखी सोहळ्यांची. त्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांची. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांची.

इतकेच नव्हे तर, कन्नड, तेलंगण, आंध्र प्रदेश आदी भागांतून येणाऱ्या भाविकांची. भाषा कळत नसली, तरी भावभक्तीची. पंढरपूरच्या पांडुरंगाप्रती असलेल्या श्रद्धेची. दोन- दोन, तीन- तीन दिवस बारीत थांबून दर्शन घेणाऱ्या भक्तांची. युगानुयुगे विटेवरी उभ्या विठुरायाची. चैतन्यमयी वातावरणाची. आनंदमयी जीवनाची. टाळ-मृदंगाचा गजर करीत होणाऱ्या वाटचालीची.

वाटेवरच्या माळरानावर घटकाभर विसावा घेण्याची. पिठलं भाकरीच्या नैवेद्याची. ‘धावा धावा, आहे समीप विसावा’ म्हणत पंढरीच्या वाटेने धावण्याची. ‘शिन गेला भाग गेला, अवघा झालासे आनंद’ म्हणून मुखाने ‘पुंडलिक वरदेऽ हरिऽ विठ्ठलऽऽ श्रीज्ञानदेवऽ तुकारामऽऽ’ असा गाजर करण्याची. आणि ‘अगा म्या देवाचा देव पाहिला’ म्हणत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याची.

नतमस्तक होणे म्हणजे नम्रता. ही नम्रता आई-वडिलांच्या संस्कारातून शिकायला मिळाली, बालपणापासून ऐकता आली. त्यामुळे सर्वप्रथम नतमस्तक व्हायचे, तर आई-वडिलांच्या चरणावरी आणि पुंडलिकासारख्या भक्तासाठी युगानुयुगे विटेवरी उभ्या असलेल्या विठुरायाच्या चरणावरी. तिथे नतमस्तक झाल्यानंतर सारा अहंकार गळून पडल्याशिवाय राहत नाही.

कारण वारकरी संप्रदायाचा पायाच ‘एकमेका लागतील पायी रे’ असा आहे. उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभावच तिथे नाही. सर्व जण एकमेकांच्या पाया पडतात. तिथेच आम्हाला समानतेची आणि नम्रतेची जाणीव होते. हे प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच आपल्याला कळत असते.  ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदाच्या आषाढी वारीत ‘वारी विठुरायची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची’ या संकल्पनेतून ‘साथ चल’ उपक्रम आखला आहे. असे वेगवेगळे उपक्रम ‘सकाळ’ दरवर्षी राबवीत असतो. ‘हरित वारी, निर्मल वारी’, ‘अन्नदान’, वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी प्लॅस्टिकचे घोंगडे वाटप, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, ‘साम टीव्हीच्या माध्यमातून समाजप्रबोधन, स्वच्छतेबाबत जनजागृती, ‘जलदिंडी’ यात ‘सकाळ’चा सहभाग मोलाचा आहे. वारीच्या वाटचालीचा वृत्तान्त छापील आणि दृश्‍य स्वरूपात घराघरांत पोचविण्याचे काम ‘सकाळ’ने प्रभावीपणे केलेले आहे, करीत आहे. त्या माध्यमातून सर्व समाज घटकांपर्यंत वारी पोचली आहे. त्यामुळे ‘आपुलिया हिता प्रेमाचा सकाळ’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com