#saathchal आळंदीत दर्शनबारीचे आरक्षण

#saathchal The Warakari demanded reservation
#saathchal The Warakari demanded reservation

आळंदी - आळंदी सुधारित शहर विकास आराखड्यात दर्शनबारीसाठी टाकलेले आरक्षण शासनाने उठवले. मात्र आज पावसामुळे रस्त्यावरील उभ्या वारकऱ्यांचे हाल झाल्याने मोठ्या सुसज्ज दर्शनबारीची आवश्यकता असल्याची गरज निर्माण झाली. दरम्यान दर्शनबारीचे आरक्षण पुन्हा जैसे थे ठेवण्याची सदबुद्धी माउलींनी सरकारला द्यावी अशी भावना वारकऱ्यांनी आज बोलून दाखवली.

आळंदीत आषाढी वारीनिमित्त पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी येवू लागले आहे. ६ जुलैला माउलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान असून अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले. मात्र आज सकाळपासून पावसाची रीपरीप सुरू होती. तर पहाटेपासून भाविकांनी भर पावसातही दर्शनासाठी रांगेत उभे होते. माउली मंदिरातील दर्शनमंडप पूर्ण भरून रांग भक्ती सोपान पूलावरून इंद्रायणी नदीच्या पलिकडे गेली होती. मात्र याठिकाणी देवस्थानकडून निवाऱ्यांची सोय केली नसल्याने भाविकांना पावसात भिजावे लागले. दिवसभर पाउस सुरू होता. महिला वारकरीही पावसात उभ्या असल्याचे चित्र होते. पावसामुळे पायाखाली चिखल झाला होता. तरिही भाविकांची दर्शनासाठीची ओढ कमी झाली नव्हती. मात्र शासनाने सोय न केल्याने भाविकांना माउलींच्या दर्शनासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आळंदी सुधारित शहर विकास आराखड्यात इंद्रायणीच्या पलिकडे एका शिक्षण सम्राटाच्या आणि नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पति माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या सुमारे पंच्याहत्तर गुंठे जागेत दर्शनबारीचे आरक्षण मंजूर होते. मात्र राजकिय आणि आर्थिक वजन वापरून शासनदरबारी आरक्षण उठविण्याची मंजूरी आणली गेली आणि दर्शनबारी उभारण्यचा देवस्थानपुढे प्रश्न उभा राहिला. आज सुसज्ज दर्शनबारीची गरज का आहे याची जाणिव सर्वांनाच झाली. दरम्यान रांगेतील अनेक भाविकांना चिखलात आणि भर पावसात उभे राहावे लागल्याने असुरक्षितता जाणवली आणि यातूनच काहींनी सरकारला माउलींनी सदबुद्धी देवो आणि सुसज्ज दर्शनबारी उभी राहो अशी भावना बोलून दाखवली.

याबाबत आळंदी विकास मंचचे कार्यकर्ते संदिप नाईकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मंत्री गेल्या दोन वर्षात आळंदीत अनेकदा आले. अनेकांनी निवेदने देवून दर्शनबारीच्या जागेच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र त्याकडे मंत्र्यांकडून दुर्लक्ष केले गेले. राज्यशासनाने तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात दर्शनबारीचे काम प्रस्तावित केले. मात्र तरिही संबंधित धनदांडग्यांच्या जमिनीवरिल आरक्षण उठवून शासनाने भाविकांची गैरसोय केली. हे पाप भाजपाप्रणित शासनाचे आहे.

आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी सांगितले की, सदरची जागा मिळविणेबाबत न्यायालयिन प्रक्रिया सुरू आहे. मात्र आजही आमची शासनाकडे भाविकांची गैरसोय पाहता तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला ही जागा दर्शनबारीसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे.
आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त भालचंद्र नलावडे यांनी सांगितले की आळंदी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी लाखो भाविक माउलींच्या समाधी दर्शनासाठी येतात. अशावेळी उनवारा पाउस यापासून बचाव होण्यासाठी नदीच्या पलिकडे सुसज्ज दर्शनबारीची आवश्यकता होती. शासनाने एकदा आरक्षण टाकून पुन्हा ते उठविले. भाविकांपेक्षा शासनाला धनदांडगे जवळचे वाटत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च असल्याने त्वरित निर्णय घेवून दर्शनबारीचे आरक्षण पुन्हा कायम ठेवावे. अन्यथा वारकऱ्यांना वेगळ्या संकटाला सामोरे जावे लागेल. शासनाने वारकऱ्यांच्या समस्येचा केवळ आळंदीतच नाही तर पालखी मार्गावरही गांभिर्याने विचार करावा.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com