भेदरलेल्या पर्यटकांना पाटलांच्या रूपाने देवदूतच भेटला

भेदरलेल्या पर्यटकांना पाटलांच्या रूपाने देवदूतच भेटला

पौ़ड : मुळशी तालुक्यातील तैलबैला घाटात वाट चुकल्याने अडकलेल्या पर्यटकांची येथील पोलिस पाटील गणेश अनंता मेणे यांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली. घनदाट जंगलात रात्री सात ते एकवाजेपर्यंत सैरबैर झालेल्या कोल्हापूरच्या पंचवीस पर्यटकांना मेणे यांनी कोकणातील आपल्या नातेवाईकांमार्फत सुखरूप सुरक्षित स्थळी पोचविले.

जीवघेण्या कड्याच्या दिशेने जाणाऱ्या, भेदरलेल्या पर्यटकांना मेणे यांच्यारूपाने देवदूतच भेटल्याने मोठी दूर्घटनाही टळली. मेणे पाटलांच्या प्रसंगावधान राखून केलेल्या कामाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

जयेश पाटील यांच्यासह पंचवीस पर्यटक कोल्हापूरहून किल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी आले होते. त्यात पाच लहान मुलांचाही समावेश होता. शुक्रवारी (20 नोव्हेंबर) सायंकाळी हे पर्यटक तेलबैला घाटातून कोकणात पालीच्या दिशेने निघाले होते. परंतू घाटात ते वाट चुकल्याने सैरबैर झाले. त्यात फोनला रेंजही नसल्याने कुणाशी संपर्क होत होता. सुदैवाने एका ठिकाणी त्यांना फोनला रेंज मिळाली. त्यामाध्यमातून त्यांनी ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधला. अधिक्षक कार्यालयातून ही माहिती पौड पोलिसांना दिली गेली. पोलिस नाईक संजय सुपे यांनी तेलबैलाचे पोलिस पाटील गणेश मेने यांना याबाबत कळविले. त्यावेळी रात्री सव्वासात वाजले होते. मेणे यांनी जयेश पाटील यांना फोन करून तुम्ही तिथेच थांबा कुठे जावू नका, असे सांगत धीर दिला. तेलबैला घाटातून उतरून पर्यटकांपर्यंत पोचण्यास खूप अंतर होते.

त्यामुळे मेणे यांनी जयेश पाटील यांचा कोकणातील कोंडगावचे मित्र लक्ष्मण बावधने यांच्याबरोबर मोबाईल कॉन्फरन्सवरून संपर्क साधून दिला. बॅटरीच्या प्रकाशाच्या माध्यमातून बावधने यांनी पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू तो झाला नाही. त्यानंतर मेणे यांनी कोकणातीलच ठाणाळ्यात राहणारे नातेवाईक अर्जून चिंधू मेणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ठाणाळ्याच्या घाटात येवून पर्यटकांना शोधण्याची विनंती केली. त्यावेळी अर्जून, रमेश चिंधू मेणे आणि रामा जाणू वाघमारे हे तिघेजण रात्री नऊच्या सुमारास ठाणाळ्यातून घाटाच्या दिशेने निघाले.

ठाणाळ्याच्या घाटातील जंगलात बॅटरीचा प्रकाश आणि मोठ्या आवाजात दिलेल्या घोषणांनी पर्यटकांचा मेणे बंधूंनी कानोसा घेतला. त्याच दरम्यान अडकलेले पर्यटकही सैरबैर चालत होते. ते ठाणाळ्याच्या कड्याच्या दिशेने निघाले होते. परंतू मेणे यांच्या आवाजामुळे ते मागे फिरले त्यांनीही जय भवानी, जय शिवाजीच्या मोठ्याने घोषणा दिल्या. बॅटरीचा प्रकाश सभोवताली फिरविला. फटाके वाजविले. आवाज आणि बॅटरीच्या प्रकाशामुळे रात्री अकरा वाजता भरटकलेल्या पर्यटकांना भेटण्यात मेणे बंधूंना यश आले. त्यांनी सर्व पर्यटकांना पाणी पिण्यास दिले. त्यानंतर सर्वजण ठाणाळे गावच्या दिशेने आले. रात्री एक वाजता सर्वजण गावात पोचले. तिथून अर्जून मेणे यांनी पोलिस पाटील गणेश यांच्याशी संपर्क साधून सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे सांगितले. त्यानंतर मेणे निर्धास्त झाले.

दरम्यान, अर्जून आणि रमेश यांनी सर्व पर्यटकांना रात्री घरी नेले. मध्यरात्रीच्यावेळी त्यांना जेवण दिले. त्यांच्या मुक्कामाची सोय केली. दुसऱ्या दिवशी पर्यटकांनी मेणे बंधूंचे आभार मानले. तर गणेश मेने यांना फोन करून तुम्ही साक्षात देवदूतासारखे धावून आल्यामुळेच आम्ही वाचलो, अशा भावना व्यक्त केल्या. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com