पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी पूर्ण केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे अजूनही पाऊस नसल्याने दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे संमेलनाच्या स्थळाबाबत नेमका कोणता निर्णय घेण्यात येणार?, याबाबत उत्सुकता आहे.
या वर्षीचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी लवकरच स्थळ निश्चित होणार आहे. यासाठी स्थळ निवड समितीकडून नाशिक आणि उस्मानाबादमध्ये पाहणी केली. या समितीमध्ये कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा घोडे, डॉ. रामचंद्र काळुंखे, विद्या देवधर, प्रकाश पायगुडे, प्रदीप दाते, प्रा. प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणांच्या पाहणीबाबत चर्चा करून ते अहवाल तयार करणार आहेत. त्यानंतर तो अहवाल साहित्य महामंडळाकडे देण्यात येणार आहे. सर्व बाबी तपासून साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करून लवकरच जाहीर केले जाईल. स्थळ निवडण्यासंदर्भात पाहणी करताना संमेलनासाठी त्या ठिकाणचे मनुष्यबळ किती आहे?, अपेक्षित निधी उभा करता येणार आहे का?,
तेथे होणारे परिसंवाद आणि मान्यवरांच्या व्याख्यानासाठी जागा किती आहे?, ग्रंथ प्रदर्शनासाठी किती जागा आहे? अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला आहे. याबाबत उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत यापूर्वीही महामंडळाने दिले होते. परंतु, दुष्काळाची स्थिती असल्याने याबाबत कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी समितीकडून दोन्ही ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी योग्य आणि मोठी तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही याबाबतचा अहवाल साहित्य महामंडळाकडे देणार आहोत. त्यानंतर त्यातील सभासद चर्चा करून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल.
- प्रकाश पायगुडे, सदस्य, स्थळ निवड समिती.
|