अध्यात्म, विज्ञानाची सांगड घालावी - डॉ. विजय भटकर

Sakal Saptahik Diwali Magzine 2019
Sakal Saptahik Diwali Magzine 2019

पुणे - ""अध्यात्म आणि विज्ञान या दोहोंचाही अभ्यास न केल्याने अज्ञानातून याविषयी वाद निर्माण होतात. विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळे नाहीत. आत्म्याचे ज्ञान म्हणजे अध्यात्म. विज्ञानाची परिणती ही अध्यात्मातच होणार आहे. त्यामुळे या दोहोंचाही अभ्यास महत्त्वाचा आहे; अन्यथा तुमच्याकडे आलेले ज्ञान हे अर्धवट असेल,'' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. 

"सकाळ'च्या बुधवार पेठ कार्यालयात "सकाळ साप्ताहिक'च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी "सकाळ माध्यम समूहा'चे संपादक संचालक श्रीराम पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, सहसंपादक ऋता बावडेकर, "पु. ना. गाडगीळ अँड सन्स'चे सतीश कुबेर उपस्थित होते. 

संगणक दिवाळी अंक तयार करू शकेल का? हे अंक सकस कसे करता येतील? यांसह कृत्रिम बुद्धिमत्ता : भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि संधी, मॉन्सूनचा अंदाज आदी मुद्द्यांवर डॉ. भटकर यांनी भाष्य केले. 

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे सांगताना भटकर म्हणाले, ""दिवाळी फराळापेक्षा साहित्यिक फराळ खूप चांगला असतो. ती एक मेजवानीच असते. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ आहे. माणूस जो काही विचार करतो, तो त्याला या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रत्यक्षात आणता येऊ लागला आहे. पूर्वी संगणक कविता करू शकेल का ? असा विचार मांडला होता. संगणकाने ते करून दाखविले. आता संगणक चांगला दिवाळी अंक निश्‍चितपणे काढू शकेल. तो मानवाने काढला की संगणकाने, हे ओळखताही येणार नाही.'' 

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील, अशी चिंता व्यक्त केली जाते. यावर डॉ. भटकर म्हणाले, ""संगणक भारतात आल्यावर हीच भीती व्यक्त केली होती. नंतर संगणकामुळे रोजगारही गेले. पण, अनेक नवे रोजगार तयारही झाले. हेच कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत घडेल. हे तंत्रज्ञान सध्या धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल, याचा अंदाज आताच बांधता येणार नाही.'' 

श्रीराम पवार यांनी दिवाळी अंकाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ""साप्ताहिक सकाळ'मुळे अनेक लेखक महाराष्ट्राला समजले आणि नंतर ते प्रस्थापित झाले. त्यामुळे या अंकाला वेगळे महत्त्व आहे. या दिवाळी अंकात मानवी बॉंबमागील मानसिकता आणि त्याचे समाजशास्त्रीय विश्‍लेषण आहे. ऊसतोडणी कामगार महिला गर्भाशय काढून टाकतात, हे वास्तव, यांसह नामवंत लेखक, कवींच्या कथा, कवितांनी हा अंक सजला आहे.'' 

प्रतिशब्दामुळे मराठी भाषा समृद्ध 
परदेशी भाषांमध्ये व्यक्त झालेले विचार, साहित्य मराठीत येत नाही. परंतु, दिवाळी अंकांनी ते अनुवादित करून आणले पाहिजे. तसेच, इंग्रजीतील अनेक संज्ञा, तंत्रज्ञानाचा मराठीत विचार होत नाही. त्यामुळे प्रतिशब्ददेखील तयार होत नाहीत. हे शब्द तयार झाले, तर मराठी भाषा अधिक समृद्ध होत राहील, अशी भावना डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com