‘बीआरटी’च वाढवेल पुण्याचा वेग!

BRT
BRT

कार किंवा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना मोकळा ‘बीआरटी’ मार्ग पाहून चिडचिड होणे साहजिक आहे. एका बाजूला वाहनांची गर्दी होतेय आणि ‘बीआरटी’ मार्गावर मात्र फक्त पीएमपीच्या गाड्याच जातात, हे अनेकांना सहन होत नाही. मात्र सार्वजनिक बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांच्या कितीतरी पटीने जास्त आहे. जे प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात, ते व्यक्त होत नाहीत; मात्र त्यांचा प्रवास जलद गतीने होणे आणि खासगी वाहनांची संख्या कमी करणे याला प्राधान्य द्यायला हवे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अहमदाबादसह जगभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ‘बीआरटी’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. या ठिकाणी साहजिकच खासगी वाहनांपेक्षा प्रवाशांनी `बीआरटी’च्या बसमधून प्रवास करण्याला प्राधान्य दिले आहे. याचे कारण सुरक्षितता आणि प्रवासाचा वाचणारा वेळ हे आहे. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, असे प्रत्येकाचे मत आहे; मात्र त्यासाठी एकत्रित प्रयत्न होत नाहीत. हे ‘बीआरटी’च्या प्रयोगावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या १४ वर्षांपासून पुण्यात विविध रस्त्यांवर ‘बीआरटी’चा प्रयोग करण्यात आला; मात्र अंमलबजावणीतील त्रुटी आणि खासगी वाहनचालकांची मानसिकता यामुळे त्याला यश मिळाले नाही. २००६मध्ये सातारा रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर ‘बीआरटी’ सुरू करण्यात आली. त्यावेळी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. प्रवाशांचा वेळही वाचत होता. मात्र अंमलबजावणीतील त्रुटी आणि ‘बीआरटी’ मार्गातील घुसखोरी यामुळे या मार्गात अपघात झाले आणि याचा दोष संपूर्ण प्रयोगाला देण्यात आला. त्यानंतर सुमारे शंभर कोटींहून अधिक निधी खर्च करून नव्याने या मार्गाची पुनर्बांधणी करण्यात आली आणि गेले दोन-तीन दिवसांपासून पुन्हा ‘बीआरटी’ धावू लागली. सध्या या मार्गावर रोज २५० बस धावताहेत. त्यातून सुमारे दोन ते अडीच लाख नागरिक प्रवास करीत आहेत. ‘बीआरटीमुळे साहजिकच प्रवाशांचा वेळ वाचला आहे. मात्र अद्यापही या मार्गातील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. 

‘बीआरटी’ लेनमध्ये अनेक दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. बस स्थानकांमध्ये स्वयंचलित दरवाजे व ‘आरएफआरडी रीडर’ बसविणे आवश्यक आहे. ‘बीआरटी’ मार्ग ज्या ठिकाणी सुरु होतो, त्या ठिकाणी ‘बीआरटी मार्ग सुरू होत आहे खाजगी वाहनांनी प्रवेश करू नये’, अशा आशयाचे फलक लावणे आवश्यक आहे. सर्व चौक, पंक्चर आणि पादचारी मार्गावर थर्मो प्लास्टिक पेंटिंग करणे आवश्यक आहे. प्रत्येक चौकामध्ये बीआरटी सिग्नल रिफ्लेक्टर, पादचारी सिग्नल ही कामे होणे आवश्यक आहेत. स्थानकांवरील रॅम्प व्यवस्थित नसल्याने प्रवासी घसरून पडण्याची शक्यता आहे. 

पुण्याला ‘बीआरटी’ची गरज आहे; पण केवळ त्यातील त्रुटींमुळे या योजनेला पुन्हा एकदा ‘रेड सिग्नल’ मिळणार नाही, याची जबाबदारी महापालिका, पीएमपीएल, वाहतूक पोलिस यांनी एकत्रितरीत्या घ्यायला हवी. या योजनेला पोलिसांचे विशेष सहकार्य लागणार आहे. नागरिकांनीही ‘बीआरटी’ मध्ये घुसून स्वतःहून अपघातांना निमंत्रण देता कामा नये. शहरात जोपर्यंत चांगली नागरी संस्कृती तयार होणार नाही, तोपर्यंत कोणताही चांगला प्रकल्प यशस्वी होणार नाही. सातारा रस्त्यावरील ‘बीआरटी’चा प्रयोग यशस्वी व्हायला हवा. त्यानंतर नगर रस्ता, हडपसर, आळंदी रस्ता या ठिकाणची ‘बीआरटी’ सुरळीत होईल आणि शंभर किलोमीटरचे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करता येईल. शहरातील वाढती वाहने, वाहतुकीची होणारी कोंडी यावर ‘बीआरटी’ चांगला उपाय आहे, हे प्रशासनाने आणि नागरिकांनीही कधीच विसरता कामा नये. 

असा आहे स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग

  • ६.५ किलोमीटर एकूण लांबी  
  • ११ एकूण बसथांबे  
  • १२ एकूण चौक  
  • ३ मार्गावरील मोठे पंक्चर 
  • २९४६ बसच्या दैनंदिन फेऱ्या 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com