...तर आसामचे काश्‍मीर होईल - कश्‍यप

समुद्र गुप्त कश्‍यप
समुद्र गुप्त कश्‍यप

पुणे - आसाममधील चाळीस लाख लोक त्यांचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करू शकलेले नाहीत. बेकायदा स्थलांतरित नागरिकांमुळे स्थानिक भूमिपुत्र अल्पसंख्याक ठरू लागले आहेत. हे अतिक्रमण रोखले नाही, तर काश्‍मीरप्रमाणेच आसामच्या नागरिकांना अन्य राज्यात आश्रय घ्यावा लागेल, अशी चिंता आसामधील ज्येष्ठ पत्रकार समुद्र गुप्त कश्‍यप यांनी व्यक्त केली.

सरहद संस्थेने ‘हाक बह्मपुत्रेची’ या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सरहदचे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर, जाहीद भट, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) या मुद्द्यावर कश्‍यप यांनी सविस्तर विवेचन केले. पूर्वी पाकिस्तान, नंतर बांगलादेशातून स्थलांतरित नागरिकांमुळे निर्माण झालेल्या समस्या त्यांनी मांडल्या.

कश्‍यप म्हणाले, ‘‘राष्ट्रीय नागरिकत्वाची नोंदणी हा मुद्दा हिंदू विरुद्ध मुस्लिम वा आसामी विरुद्ध बंगाली असा नाहीच, तर ईशान्येकडील राज्यांतील सार्वजनिक मालमत्ता, तेथील नागरिकांचे हक्क यांच्या संरक्षणाचा हा विषय आहे.’

‘एनआरसी’चा मुद्दा समजून घ्या
‘एनआरसी’च्या मुद्द्यावर टीका केली जाते. परंतु हा विषय अनेकांनी समजून घेतलेला नाही. कुणी त्याला राजकीय बनविले आहे. परंतु जनतेने नेमका प्रश्‍न समजून घ्यावा, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल अभ्यासावेत. आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरीही ४० लाख नागरिक ते सिद्ध करू शकलेले नाहीत. या लोकांचे करायचे काय, हा प्रश्‍न कसा सोडवायचा, हे आता संसदेत बसलेल्या लोकप्रतिधिनींनी ठरवावे, अशी अपेक्षा कश्‍यप यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com