Vidhan Sabha 2019 : आहे चकाचक तरीही

Patil Estate slums
Patil Estate slums

विधानसभा 2019 
वार्तापत्र : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ करायचे म्हणून सर्वांत जास्त कामे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात करण्यात आली. रस्ते व पदपथ चकाचक करण्यात आले. एकीककडे हा दिखाऊपणा, तर दुसरीकडे मतदारसंघातील नागरिक वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, रखडलेले एसआरए प्रकल्प, अशा समस्यांच्या चिखलात फसले आहेत. गेल्या पाच वर्षांत यातील एकही समस्या पूर्णपणे सुटलेली नसल्याने त्यांचे स्वरूप गंभीर होत आहे.    

शिवाजीनगर मतदारसंघात डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनी, गोखलेनगर, पुणे विद्यापीठ, औंध, बोपोडी, खडकी, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर गावठाण असा मोठा भाग येतो. अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये, लष्कराचा भाग, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशी महत्त्वाची ठिकाणे मतदारसंघात येतात. उच्चभ्रू सोसायट्या, गावठाण आणि झोपडपट्ट्या अशा सर्व स्तरांतील लोकवस्ती येथे आहे.

या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे पिंपरी-चिंचवड व मुंबईला जाण्यासाठी याच मतदारसंघातून जावे लागते. रोज लाखो पुणेकर कामानिमित्त या भागतून पिंपरी-चिंचवडमध्ये जातात. पण, वाहतूक कोंडीमुळे त्यांच्यासाठी हा प्रवास त्रासदायक आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपने पुणे विद्यापीठ चौकात चुकीच्या पद्धतीने बांधलेला उड्‌डाण पूल पाडून तेथे सुधारणा करण्याची घोषणा केली होती. परंतु, केले मात्र काहीच नाही. याच पद्धतीने खडकी, बोपोडी, शिवाजीनगर, रेंजहिल्स कॉर्नर येथेही वाहनचालक कोंडीत अडकून पडतात.

 मतदारसंघातील काही भागांत पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पोलिस वसाहत, बोपोडी, औंध या भागात पुरेसे पाणी मिळत 

नाही. पाण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबीयांवर आंदोलन करण्याची नामुष्की आली होती. या मतदारसंघात ३२ अधिकृत, तर ८ अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. यातील चार ते पाच झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले आहे. पाटील इस्टेट येथे तर ‘एसआरए’चा फलक लागून अनेक वर्षे झाले. पण, तेथे अद्याप काहीच झालेले नाही. गेल्या वर्षी येथे आग लागून १०० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. प्रशासकीय गोंधळ, राज्य सरकारची बोटचेपी भूमिका आणि बिल्डर लॉबी, यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना घाणेरड्या वातावरणात राहावे लागत आहे. 

मतदार म्हणतात...
  पूजा झोळे - आमच्याकडे दोन दोन दिवस पाणी येत नाही. बादल्या घेऊन सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी जावे लागते. 

  मंदार बहिरट - पादचारी मार्ग मोठे केल्याने पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. 

  जयश्री रिसबुड - पाण्याची समस्या गंभीर आहे. तीन मजले खालून पाणी न्यावे लागते. लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही पाणी येत नाही. 

  रूपेश जुनवणे - मुळा नदीत अतिक्रमण झाले आहे. पूररेषा कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने धोका आहे. याकडे लक्ष द्यावे.

  अजय पोलकमवार - औंध येथे नागरिकांना विचारात न घेता मोठे पादचारी मार्ग बांधले. त्याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com