पिंपरी (पुणे) - आळंदी-पुणे पालखी मार्गावरील दिघी-दत्तनगरनंतर जकात नाक्यापर्यंतच्या बाराशे मीटर लांब व साठ मीटर रुंद बीआरटी मार्गाच्या कामासाठी जागा हस्तांतरित केली. साठ मीटर रुंद रस्ता करणे अपेक्षित असताना पुढाऱ्यांच्या मिळकती वाचविण्यासाठी फक्त तीस मीटरच रस्ता रुंद केल्याने स्थानिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गादरम्यानचा विकास आराखड्यातील 60 मीटर रुंद रस्ता विकसित करण्यासाठी जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मंजूर झाला. ठेकेदाराला कामाचा आदेश दिला. मात्र, जागा ताब्यात नसल्याने अनेकांकडून तातडीने आगाऊ ताबा घेत नोटीस न देणाऱ्यांचीही घरे, दुकाने पाडण्यात आली. साठ मीटर रुंद रस्ता होणार असल्याचे लोकांना सांगितले. मात्र, दत्तनगरनंतर अडथळा ठरणाऱ्या पुढाऱ्यांच्या इमारती वाचविण्यासाठी रस्त्याचे काम तीस मीटरच झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
घटनाक्रम
- दिघी, वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होलीतील रस्ता रुंदीकरणातील बाधितांच्या नुकसान भरपाई खर्चास मंजुरी : 20 नोव्हेंबर 2006
- तातडीच्या भूसंपादनासाठी उपसंचालकांचे भूसंपादन विशेष अधिकाऱ्यांना पत्र : 25 एप्रिल 2008
- रस्ता साठऐवजी तीस मीटर रुंदीकरणासाठी आयुक्तांची टिपणी : 8 जून 2015
- नुकसान भरपाईसाठी सरकारी कोशागारात आठ कोटी 38 लाख 78 हजार 117 रुपये जमा करण्यासाठी आयुक्तांची मान्यता : 2 नोव्हेंबर 2008
- 25 कोटी 45 लाख 46 हजार 189 रुपयांची निविदा प्रसिद्ध : 7 नोव्हेंबर 2015
- मनीषा कन्स्ट्रक्शनची 18 कोटी तीन लाख 56 हजार 157 रुपयांची निविदा मंजूर : 29 डिसेंबर 2015
- कामाचा आदेश : 29 जानेवारी 2016
दत्तनगरनंतर तीस मीटर रस्ता होणार होता, तर साठ मीटरसाठी जागा
हस्तांतरित करून टीडीआर का दिला. अनेकांनी टीडीआर विकला असून, महापालिकेचे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पाडून त्यांना उघड्यावर आणले. अठरा कोटींच्या निविदेत फक्त तीस मीटर रुंदच रस्ता केल्याने याच्या चौकशीसाठी आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक संतोष वाळके यांनी दिली. तर स्थानिक हरिभाऊ वाळके यांनी, 'साठ मीटर रस्ता होणार, असे सांगून आमची घरे पाडल्याने आम्ही भाड्याने राहत आहोत. मात्र, रस्ता तीसच मीटर झाल्याने आमच्यावर अन्याय झाला. तीस मीटर रस्ता करायचा होता, मग आमची घरे का पाडली. मोबदलाही मिळाला नाही,' असे मत व्यक्त केले. 'निविदा तीस मीटर रुंद व 1220 मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी काढण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. नगररचना विभागाच्या आराखड्यानुसार काम केले आहे. कामात कोणताच गैरव्यवहार झालेला नाही', असे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.